मुंबई – कोरोनाच्या आपत्तीमुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी महाविकासआघाडी सरकार आता आक्रमक होणार आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात आज महाविकासआघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीअंती आमदारांची नियुक्ती तातडीने व्हावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आग्रह धरण्याचे निश्चित झाल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात या मुद्द्यावर बराचवेळ चर्चा सुरु होती. नंतर या बैठकीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हेदेखील सहभागी झाले.
राज्यपालांनी या प्रक्रियेसाठी वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता फारच उशीर होत असल्याने राज्य सरकार आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना विनंती करणार आहे.
राज्यपालांचं वेट ऍण्ड वॉच
राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांनी यावेळी आपण ज्या सदस्यांची नियुक्ती करणार आहोत त्यांचे निकष काटेकोरपणे पालन करणार आहोत. तसेच यंदा कोरानाची परिस्थिती असल्यामुळे पुढील दोन महिने नावं पाठवू नका, अशा सूचना दिल्याचंही कळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची चांगलीच पंचाईत होण्याची शक्यता आहे. जे इच्छुक उमेदवार सध्या जोरदार लॉबिंग करतायत त्यांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे.