मुंबई : भाजपाच्या विजयी आमदारांची 30 तारखेला विधान भवनात बैठक घेतली जाणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भाजपाचे 105 विजयी आमदार या बैठकीला हजर राहतील असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत भाजपाकडून सत्तेचे सूत्र लेखी स्वरुपात घ्यायचे यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे अशीही मागणी विजयी आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या मागणी भाजपचा काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना अडीच अडीच वर्षे या फॉर्म्युलावर ठाम आहे. अशात आता भाजपा ही अट मान्य करणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रीपदाचे काहीही ठरलेले नाही. सत्तास्थापनेचे काय करायचे हे अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे ठरले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे निर्णय होईल असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेला 2014 च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत मात्र त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. कारण भाजपाला सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची गरज लागणार हे निश्चित आहे. भाजपाला 105 जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपाला गाठणं कठीण आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपाला जावं लागणार आहे. युतीधर्म पाळून सरकार सत्तेवर आलं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दोन्ही पक्षांमध्ये वाटायचं ही शिवसेनेची मुख्य अट आहे. आता भाजपा ही अट मान्य करणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.