नवी दिल्ली: एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दिल्लीतील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीच्या कार्यक्रमाने वेगळ्याच चर्चा सध्या रंगत आहेत. यातच आता आणखी एक मोठी भेट दिल्लीत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरींची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजधानी दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक आहेत. त्यामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाल्याचे समोर आले आहे.
पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली. शिवाय मोदींच्या सांगण्यावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गडकरी मोदींचा कोणता निरोप घेऊन पवारांना भेटले याविषयीचेही तर्क लढवले जात आहेत.
पेगासस प्रकरणावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून त्यामुळे संसदेचं कामकाज होताना दिसत नाहीये. पेगाससवर संसदेत चर्चा व्हावी आणि पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी त्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे संसदेतील ही कोंडी फोडण्यासाठीच गडकरी यांनी पवारांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्प आणि पूरस्थितीवरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आणि नितीन गडकरी हे जेव्हा एखाद्या नेत्यांच्या भेटी घेतात. तेव्हा ते फोटो ट्विट करतात. भेटीचे कारणही सांगतात. पण या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.