नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री व भाजपच्या नेत्या मिनीक्षी लेखी यांनी शेतकऱ्यांना उद्देशून मवाली असा शब्दप्रयोग एका पत्रकार परिषदेत वापरला त्याबद्दल चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की मी शेतकऱ्यांना उद्देशून मवाली असा शब्दप्रयोग वापरला नव्हता. पण माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ प्रसारीत केला गेला.
पण त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते व माझे शब्द मागे घेते असे त्यांनी म्हटले आहे. जंतरमंतरवर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात बोलताना त्यांना मवाली या शब्दाचा उल्लेख केला होता.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्यांना उद्देशून अशा अभद्र शब्दाचा वापर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना शोभणारा नाही अशी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही त्यांच्यावर केली होती. अन्यही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या या शब्दावर आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माफी मागितली आहे.