प्रितम पुरोहित/ज्ञानेश्वर फड
माळशिरस – पालखी मार्गावर पुणे-सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांना गोडाचे किंवा पिठल भाकरीचे जेवण मिळते. मात्र सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर माळशिरसच्या गजरे मळ्यात वारकरी गर्दी करतात ते उपमा खाण्यासाठी.. सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत उपमा वाटप सुरू असते आणि प्रत्येकाला गरमा गरम उपमा दिला जातो…. काही दिंड्यांना जेवणसुद्धा दिले जाते, असे सोलापूर मार्केट यार्डचे सदस्य बसवराज इटकळे सांगतात.
या उपक्रमाला 1993 साली सुरुवात झाली. सुरवातीला पाच किलोचे पिठल भाकरी आणि उपमा वाटण्यास सुरुवात झाली. सोबत एक डॉक्टर आणि 100 रुपयांची औषधे असे नियोजन होते. आज माउलींच्या आशिर्वादाने याचं स्वरूप मोठे झाले आहे. आज 100 सेवक निःशुल्क सेवा करत आहेत. आमचे कुटुंब, याचबरोबर डॉक्टर यांची संख्यासुद्धा वाढली आहे. अणि औषधेसुद्धा.
यंदा तीन टन उपमा,
दोन लाख रुपयांची औषधे
यंदा वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3 टन उपमा म्हणजेच 3 हजार किलो उपमाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास 22 ते 25 हजार वारकऱ्यांना याचा लाभ झाला. याशिवाय, 200 वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. डॉक्टरांच्या टीममध्ये पाचजण असून वारकऱ्यांची तपासणी, ओपीडी, आयपीडी (ऍडमिट)ची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर दोन लाख रुपयांची औषधेसुद्धा वाटण्यात आली आहेत. त्यात खोकला, सर्दी यांच्या औषधांसह बेंडेज यांचे वाटप करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या टीममध्ये पाच जणांचा समावेश
या डॉक्टर टीममध्ये एकूण पाचजण आहेत. त्यातील दोनजण दाम्पत्य आहेत. मागील 2530 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. यात डॉ. सचिन बोंगरगे, डॉ. सुनील कबाडे, डॉ. स्वाती कबाडे, डॉ. शिवशंकर खोबरे,डॉ. स्मिता खोबरे, डॉ. संजय गाडवे अशी सेवा करणाऱ्या डॉक्टरांची नावे आहेत.
…म्हणून उपमाची निवड
पुणे, सातारा जिल्ह्यांत पालखी मार्गावर अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करतात. गोडाचे पदार्थसुद्धा काहीजण वाटतात. मात्र पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना काय देता येईल असा विचार आमच्या मनात आला तेव्हा उपमा सर्व वयोगातील व्यक्तींना खाण्यास योग्य अणि पचण्यास हलका असल्याने आम्ही या पदार्थाची निवड केली असल्याचे सोलापूर मार्केट यार्डचे सदस्य श्रीशैल्य आंबारे सांगतात.