आज मंत्रिमंडळाची बैठक
मुंबई (प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षण रद्द झाल्याने अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल केल्यामुळे 2019-20 वर्षांसाठीच्या शैक्षणिक प्रवेशांचे आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी वटहुकूम काढण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी उद्या तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीत वटहुकूमावर शिक्कामोर्तब होणार आहे.
विद्यार्थी तसेच मराठा नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी बुधवारी निवडणूक आयोगाला केली. या मागणीनंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक अयोगाकडून आचारसंहिता शिथिल करण्यात आली. सरकारला वटहुकूम काढण्यास परवानगी मिळाली असून उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा वटहुकूम मंजूर केला जाणार आहे.
राज्य सरकारने काढलेल्या कायद्यात कुठेही पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू होईल असे म्हटले नव्हते. ही तांत्रिक चूक सरकार दुरुस्त करणार असून पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण लागू करणारा हा वटहुकूम असणार आहे. यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय, दंत वैद्यकीय, एमबीबीएस, अभियांत्रिकी या सर्वच प्रवेशांचा प्रश्न निकाली निघेल अशी तरतूद या वटहुकूमात करण्यात येणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग अकराव्या दिवशी सुरू आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशावेळी एसईबीसी आरक्षणानुसार मिळालेले कॉलेज आणि अभ्यासक्रम कायम राहत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. हे आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने कायम करायचे असल्यास वटहुकूम काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.