मुंबई – करोना महामारीचा वेग कमी होताच आता गोवरचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई मध्ये गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गोवर आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, ही साथ पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही गोवर करोनापेक्षा पाचपट वेगाने पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लहान मुलांमध्ये तो अधिक वेगाने पसरण्याची भीती तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. मात्र, असे असले तरी गोवरचा फैलाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लसीकरणाचे आता चांगले परिणाम दिसत असून रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होत. मात्र, आता या आजराची गांभीर्य लक्षात घेऊन टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे.
दरम्यन, गोवर आजाराची वाढती रुग्णसंख्या लक्ष्यात घेऊन आता 11 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना होणार आहे. ज्याप्रकारे करोना काळात टास्क फोर्सने वाढत्या करोना रुग्णसंख्येवर लक्ष दिलं होतं, मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्याचप्रकारे गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत निर्देश दिले आहेत. 11 सदस्यांची ही टास्क फोर्स असेल, ज्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. यानुसार आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. असं देखील सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, गोवर या आजाराला मराठीत गोवर, गोवरी, किंवा हिंदीमध्ये चेचक, छोटी माता तर इंग्रजमध्ये मीझल्स किंवा रुबिओला या नावाने ओळखतात. ताप व अंगावर उठणारे पुरळ ही गोवरची सर्वांना माहित असणारी ओळख आहे. मात्र, या आजराची सर्वाधिक लागण ही लहान मुलांमध्ये होताना दिसून येत आहे.