नगर -नगर शहरातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर पडलेल्या रस्त्यांच्या खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा देऊन महापौर स्वत:ची शहरातील जबाबदारी झटकत आहेत. नगर शहरात सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते कोण बुजविणार? असा सवाल शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला आहे.
नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेची आज शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले, गिरीश जाधव, दत्ता जाधव, संतोष गेणप्पा, जालींदर वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या दुर्लक्षाने पावसाळ्यात नगर शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. शहरात एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. मोठ्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी दुचाकी वाहनचालक गल्ली बोळात शिरत आहेत. त्यातून वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण करत आहेत. करोना लॉकडाऊन काळात रस्ते दुरुस्तीसाठी संधी होती. उन्हाळ्यात कामे झाली असती. मात्र, सत्ताधारी नगरमध्ये या काळातही काहीच कामे करु शकली नाहीत, अशी टीका शिवसेना शहरप्रमुख सातपुते यांनी केली.
दरम्यान, आता नगरमधील खड्ड्यांचा प्रश्न सोडविता आलेला नाही. त्यामुळे स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे शहराती रस्त्यांचे खापर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही सातपुते यांनी केली.
तीनशे कोटींचे काय झाले?
नगर शहरात भाजपचा महापौर झाल्यास नगरला तीनशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले होते. निदान त्यातील एक, दोन कोटी रुपये आणून किमान रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अशी खोचक टीकाही सातपुते यांनी केली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसाठी दहा कोटींचा निधी दिला होता. त्याचे काय झाले, तेही जाहीर करावे, असे आव्हान सातपुते यांनी दिले.