भाजपच्या नेत्यांचीही चौकशी करण्याची केली मागणी
नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पार्टीचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावरुन मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकार हल्लाबोल केला. यावेळी मोदी सरकार प्रशासनाचा गैरवापर करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला. मायावती यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या,” जे भाजपाचे नेते स्वत:ला इमानदार म्हणत असतील तर त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. कारण, राजकारणात येण्याआधी त्यांचाकडे किती संपत्ती होती आणि आता किती संपत्ती आहे?”
याचबरोबर, वंचित पुढे गेले की त्यांना त्रास होतो. स्वत:ला हरिशचंद्र मानणाऱ्या भाजपाने सांगावे की निवडणुकीदरम्यान त्यांच्याजवळ दोन हजार कोटी रुपये कोठून आले, ही बेनामी संपत्ती नाही का? असा सवाल मायावती यांनी केला. याशिवाय मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली. दरम्यान, मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीचा तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जात होता. नोएडामध्ये आनंद कुमार यांची बेनामी जमीन असल्याचे तपासातून समोर आले. सात एकरवर पसरलेल्या या जमिनीचं मूल्य 400 कोटींच्या घरात आहे.