लखनौ – केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही केंद्र सरकारला संसदेत आणि संसदेबाहेरही पाठिंबा देऊ अशी भूमिका आता बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे याच मागणीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
कालच त्यांनी तशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आम्ही पंतप्रधानांकडे भेटीची वेळ मागितली आहे असे त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आज मायावती यांनी ही भूमिका मांडली आहे.
देशातील ओबासी समाजाची स्वतंत्र जनगणना होणे गरजेचे आहे असे मायावती यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पक्षाने खूप आधीपासून ही मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ट्विटरवर मायावतीे यांनी असा निर्णय घेतल्यास सरकारला पाठिंबा देण्याची नवीन भूमिका मांडली आहे.