लखनौ: भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याची टीका बसपाच्या सर्वेसर्वा नेत्या मायावती यांनी केली आहे. बसपा मात्र प्रसिद्धीचा हव्यास न करता स्थलांतरित मजुरांना मदत करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत तिरस्कारणीय राजकारण केले जात आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत आणि मूळ विषयावरून दुसरीकडे लक्ष भरकटवत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मायावती यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या क्षमतेनुसार लोकांना मदत करत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नको आहे, असेही मायावती यांनी एका अन्य ट्विटमध्ये म्हटले आहे.
कॉंग्रेसला जर खरोखरच स्थलांतरित मजुरांना मदत करायची असेल, कॉंग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये श्रमिक रेल्वेची तिकिटे काढणे किंवा बस उपलब्ध करून मजुरांची वाहतूक करायला पाहिजे होती, असेही मायावतींनी कॉंग्रेसला सुनावले आहे.