मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुरू केलेल्या प्रज्वला योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधान परिषदेत आज ही घोषणा केली. महिला बचत गटांच्या सदस्यांमध्ये कायदेशीर बाबी, सामाजिक आणि आर्थिक ज्ञान याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तत्कालीन सरकारने 2019 मध्ये प्रज्वला योजना सुरू केली होती. महाराष्ट्र महिला आयोगाने ही योजना राबवली.
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या एका लक्षवेधीला उत्तर देताना ठाकूर म्हणाल्या राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांनाही चौकशी आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले जाईल.
भाजप नेत्या विजया रहाटकर 2014-19 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. यावेळी बोलताना मनिषा कायंदे यांनी यातील गैरप्रकारांचा तपशील सादर केला. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कॅगच्या अहवालातही अनेक ठपके ठेवण्यात आले आहेत, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.