आंदर मावळातील फाल्गुनी जाधव हिचे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्पर्धेत घवघवीत यश
टाकवे बुद्रुक – भारत सरकारद्वारे घेण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन या स्पर्धा परीक्षेत आंदर मावळातील कशाळ (ता. मावळ) गावची फाल्गुनी सतीश जाधव हिने घवघवीत यश संपादन केले. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील मावळ कन्या फाल्गुनी आंदर मावळची शान वाढविली. या उतुंग यशाबद्दल फाल्गुनी भारत-चीन सीमेवर तैनात असणार आहे.
फाल्गुनी हिचे मूळगाव आंदर मावळमधील कशाळगाव. तिचा जन्म 1998 मध्ये आजोळी (टाकवे बुद्रुक) झाला. फाल्गुनीच्या आई-वडिलांच्या घरची परिस्थिती हलाखीची. हाताला काम मिळावे म्हणून वडील मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर रिक्षा चालवून त्यांनी कसबसं घर सांभाळलं.
पतीला कामात हातभार लावावा या हेतूने फाल्गुनीच्या आईने मंदिराबाहेर फुले, हार विकून संसाराचा गाडा हाकला. पत्नी, दोन मुले व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वडील मुंबई येथे रात्रं-दिवस रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तर आई वृषाली या पहाटे चार वाजल्यापासून फुले आणून मंदिराबाहेर हार तयार करून विकत होते. बेताच्या आर्थिक स्थितीमध्ये मुंबईत (बोरीवली) फाल्गुनीने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गोखले महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
बिकट परिस्थितीतून शिकवण….
आई-वडिलांची आजी-आजोबांचे सर्व स्वप्न उराशी बाळगून 2017 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मध्ये स्पर्धा परीक्षेत भाग घेतला. 21 जानेवारी रोजी भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये लागलेल्या निकलामध्ये यश संपादन झाले. जीवन हे देशासाठी अर्पण अशी भावना फाल्गुनी हिने व्यक्त केली.
भारत-तिबेट सीमा पोलीसमध्ये निवड झाली. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत होत्या. आईचे वडील टाकवे बुद्रूक येथील संप्रदाय क्षेत्रातील दत्तोबा असवले (आजोबा) यांनी मला शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली. लहानपणापासून आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी देश सेवेविषयी आवड निर्माण करून दिली.
– फाल्गुनी जाधव, कशाळ (ता. मावळ).