- पवना कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे आमदार शेळके यांना निवेदन
पवनानगर – पवनानगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची मागणी पवना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले.
पवना धरण परिसर गेल्या काही वर्षांपासून नावारुपाला आलेला निसर्ग सौंदर्यांने नटलेला पर्यटनासाठी पुणे, मुंबईसह राज्यातल्या शहरवासीयांना भटकंती करण्यासाठी आवडीचा परिसर परंतु करोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने लॉकडाऊनपूर्वीच 11 मार्चपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, तेव्हापासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
पवनानगर बाजारपेठेतील किराणा दुकानदार, भाजीपाला मार्केट, बेकरीवाले, टुरिस्ट, इलेक्ट्रॉनिक काम करणारे यांच्यासह या व्यावसायिकांना लागणारे साहित्य ठेवणाऱ्यांना दुकानदारांना यामुळे चांगल्या व्यवसाय उपलब्ध झाला होता. या सर्वांचा परिणाम बाजारपेठेवर झाला आणि बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली होती.
नैसर्गिक साधन संपत्तीमुळे या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत गेला. पवनानगर परिसरात कृषी पर्यटनास प्रतिसाद मिळत गेला. हा व्यवसाय शेतीपूरक म्हणून फायदेशीर वाटू लागल्याने मागील दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन सुरू झाली आहेत.
शेतकऱ्यांनी महागड्या दराने कर्ज काढून कोणत्याही अनुदानाची प्रतीक्षा न करता हे व्यवसाय सुरू केले होते; परंतु मार्चपासून व्यवसाय बंद असल्याने तरुणांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासकीय नियम अटींचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी पवना कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, सचिव रवी ठाकर, खजिनदार संजय मोहोळ, संचालक दत्तात्रय ठाकर, केशव बोडके उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, पवना धरण परिसरात स्थानिक तरुणांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. करोनामुळे पर्यटनबंदी घातल्याने पर्यटन केंद्र बंद होती; शासनाने नियम शिथील केल्याने हळूहळू व्यवसाय सुरू करता येईल, योग्य नियोजन करून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.