छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 12 मावळ प्रसिद्ध होते. त्यापैकी मावळ खोऱ्यात तीन मावळ आहेत. मावळ तालुक्यातील तीन मावळांपैकी एक म्हणजे नाणे मावळ. नाणे मावळ म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगा, नाणे मावळ म्हणजे अप्रतिम सौंदर्य, नाणे मावळ म्हणजे भात पिकाचे कोठार, नाणे मावळ म्हणजे धरणे, नाणे मावळ म्हणजे इंद्रायणी नदी व इंद्रायणी भात, नाणे मावळ म्हणजे किल्ले, नाणे मावळ म्हणजे पवनचक्या, नाणे मावळ म्हणजे ढाक भैरीचा कडा. नाणे मावळ विस्तीर्ण असा पसरलेला असून, समृद्ध अशा अनेक खेड्यांनी बनला आहे.
तळेगाव दाभाडे येथे श्रीमंत सरकार सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांच्या घराण्यातील समाध्या आहेत. राजावाडा आहे. महादजी शिंदे यांनी इंग्रज अधिकारी स्टुअर्ड फाकडा याला याच नाणे मावळात वडगावच्या लढाईत धारातीर्थी पाडले. येथील इंद्रायणी व कुंडलिका नदी पुढे जाऊन देहू-आळंदीला पोहचतात. या मावळात इंद्रायणी नावाचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकतो. कार्ला, भाजे, पाले अन्य अनेक अर्धवट खोदलेल्या लेणी या मावळात आहेत. नाणे गाव ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक बाजारपेठ होती. तळेगाव व थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा-खंडाळा ही गावे या मावळात येतात.
हौशी ट्रेकर्सची मांदियाळी
थंड हवेचे ठिकाण म्हणून “लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाऱ्या पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणाईच्या चर्चेत येतो तो लोणावळा-खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजी महाराजांचे गडकोट. त्यांना येथील निसर्ग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच.
कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात. काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. देहुरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातील दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही भटकंती करावी लागते.
लोणावळ्याची पर्यटकांना मोहिनी
मावळात वर्षाविहाराचा आनंदपर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय, तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात. पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली व फज खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते.
धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक-दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल.
पाऊस अन् सुपीक जमीन
भरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागातील शेतकऱ्यांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. वडिवळे धरणाचे कालवे काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले. त्यातून एकदाही शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही आणि भविष्यात मिळेल याची खात्री नाही. शेतकऱ्यांना भात-ऊस या ठराविक पिकांशिवाय अन्य पिकांची माहिती देणारे शासकीय यंत्रणा नाही. याशिवाय वैभवसंपन्न नाणे मावळ समोरची आव्हानं मांडत असताना सर्व मुद्दे नकारात्मक भुमिकेतून मांडलेली असावीत, असे वाटण्याची शक्यता असली तरी वास्तव मात्र तेच आहे. ही आव्हाने शासन व प्रशानाच्या पातळीवर पेलण्यास सकारात्मकता दाखवल्यास खरोखरच नाणे मावळ खऱ्या अर्थाने वैभवसंपन्न होईल.
धरण उशाला आणि कोरड घशाला
संततधार पावसाने मावळातील ग्रामीण भागातील रस्ते खराब होतात.नद्यांवरील पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्कही तुटतो. पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित असल्याचे दिसून येते.पर्यटनाच्या दृष्टीने प्रशासन उदासिन असल्याचे दिसून येते. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था नाणे मावळात दिसते. “टाटा पावर’च्या ताब्यात असलेल्या धरणांतून शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नाही. वडिवळे सारख्या धरणात मासेमारी व बोटिंगच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून देता येऊ शकतो, परंतु त्या दृष्टीने लोकप्रतिनिधीही ठोस पावले उचलताना दिसत नाही.
निसर्गाच्या कुशीतील शहरीकरणाचा थाट
पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. निसर्गाच्या कुशीत स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे.
बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाऱ्या विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल.
निसर्गाची देखणी सजावट…
नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे. नाणे मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.
गेल्या काही वर्षांत लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन काय कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.