आळंदी – करोनाच्या सावटामुळे यंदा श्री माउलींच्या पालखी सोहळ्याची परंपरा खंडित होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण आज आळंदी देवस्थानात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की वर्षानुवर्षे चालत आलेली पालखीची परंपरा खंडित करायची नाही यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
आळंदी देवस्थान अंतर्गत माऊलींच्या पादुका पंढरीकडे घेऊन जाणा-या घटकांसोबत ही बैठक झालेली आहे. त्यात असा निर्णय झाला आहे की भविष्यात करोनाचे सावट कमी होईल की नाही हे आता सांगणे अवघड आहे त्यामुळे पालखी सोहळा कशा पद्धतीने न्यायचा याबाबत तरी अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. पण पालखीसोहळा खंडित होणार नाही यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. करोनाच्या सावटानुसार त्यात्यावेळी भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.