पुणे – उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या अखत्यारातील राज्यातील अस्तित्वातील कोणत्याही विशिष्ट नावे संबोधण्यात न येणाऱ्या शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांना यापुढे “मातोश्री शासकीय वसतिगृह’ असे नाव दिले जाणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे.
राज्याच्या विभागात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहे आहेत. मात्र, या वसतिगृहांना कोणत्याही नावाने संबोधले जात नव्हते. राज्यातील बहुतांश शहरात मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहे आहेत.
मात्र, त्याचा उल्लेख केवळ शासकीय वसतिगृह असाच व्हायचा. या वसतिगृहांना “मातोश्री शासकीय वसतिगृह’ असे नाव देण्याची मागणी होत होती. त्याचा विचार करून राज्य शासनाने यापुढे शासकीय वसतिगृहांना “मातोश्री वसतिगृह’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय वसतिगृहे ही केवळ भितींचा निवारा न राहता, वसतिगृहे ही मुला-मुलींसाठी आधार, आपुलकी व स्नेहभाव निर्माण करणारी आधारगृहे असावीत. मुला-मुलींचे शिक्षण सहज व आनंददायी व्हावे, पालकांच्या मनात मुला-मुलींना शासकीय वसतिगृहात ठेवण्याविषयी विश्वास निर्माण व्हावा, मुला-मुलींना आपल्या घरापासून दूर शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत असताना वसतिगृहे हे स्नेहभाव व जिव्हाळ्याची उब देणारे ठिकाणी आहे.
हा भाव त्यांच्या मनात रूजावा, या उद्देशाने शासकीय वसतिगृहांना “मातोश्री वसतिगृह’ असे संबोधणे संयुक्तिक राहील. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.