बुलढाण/मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीचा गणीताचा पेपर बुलढाण्यात फुटल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून सातत्याने विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. यावरून माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच, हे सरकार झोपले आहे का असा सवालही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.
आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी 11 वाजता पेपर सुरू होण्याच्या अर्धातास आधीच बुलढाण्यात पेपर फुटला. ही माहिती विरोधी पक्षनेते यांना कळताच त्यांनी लागलीच विधानसभेत याची माहिती देऊन संताप व्यक्त केला. गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला. अभ्यास करणाऱ्या मुलांचे यामुळे किती वाटोळे होते. सरकार झोपले की काय, काय चालले कळत नाही. मी बोललो की बोलता दादा बोलतात, अशा संतापलेल्या सुरात त्यांनी सरकारला धारेवर धरले.
अजित पवारांनी पेपरफुटीचा मुद्दा मांडताच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही सभागृहात सत्ताध-यांवर निशाणा साधला. या सरकारच्या काळात परीक्षा सुरू झाल्यापासूनच सातत्याने समस्या सुरू आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरात दोन-दोन गुणांचे तीन प्रश्न चुकीचे आले. त्यानंतर मराठीच्या पेपरएवजी इंग्रजीचा पेपर मुलांना मिळाला.
आता तिसरी घटना म्हणजे बुलढाण्यात पेपर अर्धातास आधीच फुटला आहे. हे सरकार नक्की काय करत आहे? कॉपीमुक्त परीक्षेसाठी यांनी भरारी पथक नेमले, मोबाईल निषिद्ध केले, दहा मिनिटे आधी पेपर द्यायचा हे ठरवले गेले. मग तरीही अर्धा तास आधी पेपर बाहेर गेला कसा?, असे प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पेपर फुटीचा मुद्दा गंभीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे सरकारने याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी केंद्र प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करता येईला का यासंदर्भात आज सायंकाळपर्यंत राज्य सरकार निवेदन सादर करेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
साखर खेर्डा येथे तक्रार दाखल
बुलढाण्यातील सिंदखेडराजामध्य बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पुण्यातही बोर्डाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.