पुणे – शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि. यांच्या वतीने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. याच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते.
आपल्या जीवनात अंक आणि नाद अपरिहार्य आहे. आधुनिक तंत्राचे स्वागत करताना पारंपरिक पाढे विसरता कामा नयेत. जुन्या पिढीला निमकी, अडीचकी, पावकीची परीक्षा असायची. पाठांतराची परंपरा अभ्यासातून कमी झाली तरी पाठांतराला दुय्यम लेखता कामा नये. हिशेब करताना या पाठांतराचा फायदा व्हायचा. जुनेपणाचा शिक्का मारून पाढे दूर लोटू नका, असा सल्लाही देसाई यांनी दिला.
या स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत पाठांतराचे व्हिडीओ अपलोड करता येतील. 1 ते 15 जानेवारीपर्यंत परीक्षण होईल. त्यानंतर 15 जानेवारीला जिल्हास्तर निकाल जाहीर होणार आहे.