करोना विषाणूच्या महासंकटामुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला जोरदार फटका बसला असतानाच विशेषतः क्रिकेटला सर्वांत जास्त फटका बसला असतानाच आता नव्याने मॅचफिक्सिंगचे ढग क्रिकेट विश्वावर आले आहे. 2011 मध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप श्रीलंकेचे राजकारणी नेते आणि माजी क्रीडामंत्री यांनीच केला असल्यामुळे क्रिकेट विश्वावर पुन्हा एकदा संशयाचे ढग फिरू लागले आहेत.
2011 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन संघ होते आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेवर विजय मिळवून विश्वचषकावर नाव कोरले होते; पण श्रीलंकेच्या तत्कालीन क्रीडामंत्री यांनीच या सामन्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भारताच्या विजयाकडेही संशयाने पाहिले जात आहे.
श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्री यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रीलंकेच्या बाजूनेच जरी मॅचफिक्सिंग झाले असले आणि कोणत्याही भारतीय खेळाडूंचा या मॅचफिक्सिंगमध्ये सहभाग नाही, असे दिसत असले तरी भारताने मोठ्या प्रयत्नाने मिळवलेल्या विश्वचषक स्पर्धेतील विजयावर शंका मात्र निश्चितच निर्माण झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यासाठी श्रीलंकन क्रिकेट संघाने ऐनवेळी संघात मोठे बदल केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळलेल्या विजयी संघाला कायम न ठेवता चार वेगळे खेळाडू संघात आणण्यात आले. याची कोणतीही कल्पना श्रीलंकेच्या व्यवस्थापनाला नव्हती, असा दावाही श्रीलंकेच्या या माजी क्रीडामंत्री यांनी केला आहे. उपांत्य फेरीत ज्या संघाने विजय मिळविला होता तो संघ कायम न ठेवता त्या संघातील तब्बल चार खेळाडू बदलण्याचा निर्णय आश्चर्यकारक असला तरी त्यामध्ये मॅचफिक्सिंगसारखे एखादे कारण असावे, असा संशय घेण्यासारखे सबळ पुरावे मॅचफिक्सिंगचा आरोप करणाऱ्या माजी क्रीडामंत्र्यांकडे आहेत की नाहीत याची विचारणा करण्याची गरज आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा आणि अंतिम सामन्यांमध्ये धडाकेबाज शतक झळकवणारा फलंदाज माहेला जयवर्धने यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत या सामन्यात कोणताही संशयास्पद प्रकार घडला नसल्याचा खुलासा केला आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंद डिसिल्व्हा यांनीही या सामन्यातील संशय जर दूर व्हायचे असेल तर आयसीसी, बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांनी या आरोपाची संयुक्त चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये सर्वप्रथम विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना तब्बल 28 वर्षे वाट पाहावी लागली होती. सचिन तेंडुलकरसारखे दिग्गज दीर्घकाळ भारतीय संघात असतानाही भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी खूप वाट पाहावी लागली होती. आपल्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकावी ही सचिनची इच्छा होती. 2011 मधील विजयाने ती इच्छा पूर्ण झाली.
भारतीय क्रिकेट संघ त्यावेळी सचिनला खांद्यावर घेऊन स्टेडियमवर नाचला होता. साहजिकच श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपामुळे या विजयाच्या आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले आहे. सचिनसारख्या महान फलंदाजाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरीतील विजयाचा आनंद घेता यावा यासाठी अरविंद डिसिल्वा यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्याबाबत अद्यापपर्यंत या तिन्ही संस्थांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
भारत आणि श्रीलंकेत क्रिकेट या खेळात राजकारणी नेत्यांचा शिरकाव असल्याने क्रिकेटमध्येही राजकारण येणे साहजिकच आहे. त्या राजकारणामधूनच या श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने असा आरोप केला आहे की काय, हेही पाहावे लागेल. खरे तर अंतिम फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 275 धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताला अंतिम सामन्यात विजय मिळाला होता.
श्रीलंकन क्रिकेट संघाची गोलंदाजी त्यांच्या दर्जाला साजेशी झाली नव्हती, तरीही भारताला हा विजय सहजपणे प्राप्त झाला नव्हता. परिस्थितीत केवळ श्रीलंकन क्रिकेट संघाने आपल्या संघामध्ये ऐनवेळी बदल केल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा विजय सोपा झाला, असा आरोप जर एखादा माजी क्रीडामंत्री करत असेल तर त्यामुळे भारताच्या विजयाचे श्रेय विनाकारणच कमी होते. मुख्य म्हणजे आता नऊ वर्षांनंतर हा विषय समोर आणण्याचे काय कारण होते, याचाही शोध घेण्याची गरज आहे.
या माजी क्रीडामंत्र्याला तेव्हाच या सामन्यामध्ये गडबड असल्याची माहिती होती तर तेव्हाच त्याने तोंड का उघडले नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये क्रिकेटला वेळोवेळी मॅचफिक्सिंगच्या आरोपांनी घेरलेले असले तरी आयसीसीने असे प्रकार करण्यासाठी विशेष नियंत्रण शाखा उघडल्यानंतर या प्रकारांना आळा बसला. आयसीसी पुरस्कृत विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये अशाप्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयसीसीचे सर्व पदाधिकारी आणि नियंत्रण शाखा सदैव जागरूक असतात.
त्यामुळे 2011 च्या अंतिम सामन्यांमध्ये कोणत्या प्रकारची गडबड झाली असती तर आयसीसीच्या नजरेला ती आलीच असती. क्रिकेटमधील डोपिंग आणि मॅचफिक्सिंग या बाबींना आयसीसीने खूपच गांभीर्याने घेतले असल्याने गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये मॅचफिक्सिंगचा प्रभाव जवळजवळ संपुष्टात आला आहे. असे असतानाही आता पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगचे आरोप होत असतील तर त्याची गंभीर दखल घ्यावी.
1996 च्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये श्रीलंकेकडून दारुण पराभव झाल्यामुळे बाहेर पडलेल्या भारतासाठी 2011च्या स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धचा विजय अतिशय महत्त्वाचा होता; पण या विजयाला असे संशयाचे ग्रहण लागणे योग्य नाही. भारतीय बाजूने याबाबत कोणताही संशय नसला तरी या विजयाचा निखळ आनंद चाहत्यांना घेता यावा आणि मॅचफिक्सिंगच्या चर्चा थांबाव्यात म्हणून चौकशीची गरज आहे. मॅचफिक्सिंगपासून दूर होऊ पाहत असलेल्या क्रिकेटविश्वाला पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगचे ग्रहण लागणे योग्य ठरणार नाही.