फुरसुंगी (महादेव जाधव)- दिवेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावाची प्रशासन व पुरातत्व खात्याच्या उदासीन कारभारामुळे मोठी दुरवस्था झाली आहे.
येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा हवेतच विरल्याने हा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तलावालगतचा गाळ, भिंतीची झालेली पडझड, वाढलेली झाडेझुडुपे यामुळे पर्यटक, इतिहासप्रेमींची घोर निराशा होत आहे.
हडपसर-सासवड मार्गावरील वडकी परिसरातील मस्तानी तलाव सप्टेंबर महिना उजडला तरी तलाव 30 टक्के देखील भरलेला नाही. पाऊस कमी असला तरी डोंगरावरून वाहून येणारे पाणी अडवून तलावात सोडण्यासाठीची कोणतीही संरचना नसल्याने दरवर्षी तलाव कोरडाच राहात आहे. या तलावात पाणी सोडण्याची मागणी वडकी येथील ग्रामस्थांनी अनेकदा केली असताना त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
या तलावाला चोहोबाजूंनी दगडी चिरेबंदी असली तरी जागोजागी दगड निसटत असून काही ठिकाणी ढासळले आहेत. तलावात सर्वत्र झाडेझुडपे वाढली आहेत. गाळाचे प्रमाण प्रचंड असून डोंगरावरील दगड-गोटे, माती तलावात येत आहे.
ऐतिहासिक स्थळ असूनही या तलावाच्या देखभालीसाठी कोणतीही शासकीय व्यवस्था नाही.
वडकी गावाच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठीही वरदान ठरलेला या तलावाकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावेत, उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वडकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप गायकवाड आणि ग्रामस्थांनी केली आहे.