पर्यटकांची गर्दी वाढू लागली; हॉटेल, खाद्यपदार्थ विक्री व्यवसायात उलाढाल
फुरसुंगी – वरुणराजाची कृपादृष्टी यावर्षी चांगली झाल्याने डोंगरदऱ्या आणि माळरानावरील रानफुलांना बहर आला आहे. रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, अल्हाददायक वारा, डोंगरमाथ्यावर उतरलेले ढग, दाटलेले धुके असे वातावरण दिवेघाटात असल्याने अनलॉकच्या टप्प्यात पर्यटक येथील निसर्गाकडे वळू लागला आहे.
पुणे शहराच्या उंबरठ्यावरील दिवे आणि बोपदेव घाटात उभारलेली भव्यदिव्य श्री विठ्ठलाची मूर्ती, मस्तानी तलाव, हिरवागार डोंगरमाथा विशेष प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात बहरणारा आणि वळणावळणाची वाट असलेला दिवे घाट पाहणे, म्हणजे एक अलौकिक नयनसुख असते. पुणेकर निसर्गप्रेमींसाठी दिवे घाट आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आता अनलॉकनंतर तुरळक गर्दी येथे होत आहे.
दिवेघाट आणि मस्तानी तलाव…
पावसाळ्यात दिवे घाटावर विविध फुलांच्या प्रजाती पाहायला मिळतात. यातील अनेक दुर्मिळ आहेत. नागमोडी वळणाचा रस्ता, शेजारीच मस्तानी तलाव, विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आणि आता नव्याने उभारलेली श्री विठ्ठलाची भव्यदिव्य मूर्ती, डोंगरमाथ्यावर उतरलेले ढग लक्ष वेधून घेत आहे. अल्हाददायक वारा, मधून सरी आणि रंगीबेरंगी फुलांसह पावसाच्या थेंबांनी लगडलेल्या गवताचे गालिचे पायाखाली घालण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतो. मस्तानी तलाव तर पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
व्यावसायिकांत समाधान…
दिवे घाटावर पावसाळ्यात तसेच सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ असते. या दिवसांत हजारो पर्यटक या परिसराला भेट देतात. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय देखील बहरतात. मात्र, यंदा करोना संसर्गामुळे पर्यटनावर निर्बंध आले होते. आता, अनलॉमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच, अन्य खाद्यपदार्थांची दुकानेही सुरू झाली असून पर्यटक काही प्रमाणात तरी येत असल्याने व्यावसायिकांत समाधानाचे वातावरण आहे.
पर्यटकांची तुरळक गर्दी…
करोना संसर्गामुळे पर्यटकांची वर्दळ कमी आहे. पावसाच्या सरी अद्यापही अधूनमधून कोसळत असल्याने फुलांचा बहर नेहमीपेक्षा जास्त दिवस पाहायला मिळत आहे. आणखी 15 ते 20 दिवस फुलांचा बहर कायम राहील. दिवे घाटावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी 8 ते 15 दिवसांचा असतो. सध्या, पांढऱ्या रंगाची फुले येण्यास सुरुवात झाली आहे. अनलॉकमुळे पर्यटकांची काहीशी गर्दी होत आहे.