हैदराबाद – भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून 15 ऑगस्टच्या निमित्ताने देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र तेलंगणात मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी ‘स्वतंत्र भारत वज्रूत्सालू’ या नावाने स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 16 ऑगस्ट रोजी राज्यभरात एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले जाणार असून सर्वत्र वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. हैदराबाद वाहतूक पोलिसांनी सोमवारी जाहीर केले की, सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमामुळे 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता सर्व जंक्शनवर वाहतूक पूर्णपणे थांबविली जाईल.
प्रत्येक गल्लीबोळात राष्ट्रगीत वाजवले जाईल
हैदराबादमध्ये मंगळवारी सकाळी 11:30 वाजता सर्व पब्लिक अॅड्रेस सिस्टमवर राष्ट्रगीत वाजवले जाईल. सर्व ट्रॅफिक सिग्नल लाल होतील, तर ट्रॅफिक पोलिस कर्मचार्यांकडून चालवलेली सर्व जंक्शन किंवा चौक बंद होतील. सामुहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केला आहे. मुख्य सचिव सोमेश कुमार म्हणाले की 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता सर्व ग्रामपंचायती, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वॉर्ड, प्रमुख रहदारीची ठिकाणे, शैक्षणिक संस्था, जेल, कार्यालये आणि बाजारपेठांमध्ये राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले जाईल.
सोमेश कुमार म्हणाले की, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी संबंधित पोलीस अधीक्षक/आयुक्तांच्या सहकार्याने आराखडा तयार केला आहे. कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करताना मुख्य सचिव म्हणाले की, कार्यक्रमादरम्यान कोणतीही धांदल न करता शिस्त पाळली जाईल. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट रोजी HMDA अंतर्गत सर्व उद्यानांमध्ये लोकांना विनामूल्य प्रवेश करता येईल.
दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गोलकोंडा किल्ल्यावर ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले की, संविधान रचणाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार हवे होते म्हणून संघराज्य रचना तयार केली. राज्यांनी एकत्रितपणे विकासाकडे वाटचाल करावी. केंद्र सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, दिल्लीचे सध्याचे केंद्र सरकार संघीय मूल्यांना हानी पोहोचवत आहे, केंद्र राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याच्या षडयंत्रात सामील आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांना मोफत भेट म्हणून सांगणे हा जनतेचा अपमान असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच काही राजकीय पक्षांवर फुकटचे राजकारण केल्याबद्दल टीका केली, त्यानंतर देशभरात ‘रेवाडी संस्कृती’वर वाद सुरू झाला.