चीनच्या धोरणामुळे लोकसंख्येत तब्बल दीड टक्के घट
हाँगकाँग : जगातील पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन असलेल्या हाँगकाँगची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. या देशावर चीनचे वर्चस्व असल्याने चीनच्या धोरणाचा मोठा फटका गेल्या काही कालावधीमध्ये बसल्याने लोकसंख्या तब्बल दीड टक्केने कमी झाली आहे. त्याशिवाय देशामधून स्थलांतर होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
करोना महामारीच्या काळातील कडक नियंत्रणे आणि चीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांनी हॉंगकॉंग सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी सव्वा लाख लोकांनी हॉंगकॉंग मधून पलायन केले. त्यापूर्वीच्या वर्षी 80 हजार लोकांनी आपण होऊन देश सोडायचा निर्णय घेतला होता. कित्येक वर्षे रहिवासी असलेल्यानेही हा देश सोडून देण्याची मानसिकता स्वीकारली आहे. त्यामध्ये व्यावसायिक आणि काही विद्यार्थी आणि नोकरदारही समाविष्ट आहेत.
गेला दीड वर्षांचा कालावधीमध्ये हॉंगकॉंगची लोकसंख्या दीड टक्क्याने कमी होऊन 72 लाखावर स्थिरावली आहे .1961 नंतर लोकसंख्या कमी होण्याची ही पहिलीच घटना आहे. देशामध्ये मृत्यू दराच्या तुलनेत जन्म दरही कमी झाल्याने त्याचाही फटका देशाला बसला आहे. कम्युनिस्ट सत्ताधार्यांच्या मते मात्र यामध्ये सरकारी धोरणाचा भाग नसून लोकसंख्या कमी होणे ही संपूर्णपणे नैसर्गिक घटना आहे. पण ज्या प्रमाणात लोक इतर देशात जात आहेत. त्या प्रश्नाला मात्र सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. देशात गेल्या काही वर्षांमध्ये लोकशाहीसाठी जी आंदोलने झाली ती ज्या प्रकारे दडपण्यात आली त्यामुळे लोक नाराज असून त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.