नवी दिल्ली – काश्मिरात काश्मिरी पंडितांच्या हत्या रोखण्यात केंद्रातील मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. तेथे हिंदुंच्या सर्रास हत्या होऊ लागल्या असून तेथील स्थिती हाताळण्यात भाजपला अपयश आले आहे असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काश्मिरी पंडितांना काश्मिरातून पळण्यास भाग पाडले जात आहे यावर केंद्राने तातडीने उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
काश्मिरातील वाढत्या हत्यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आम आदमी पक्षाच्या वतीने’जन आक्रोश रॅली’आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना त्यांनी काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की मी पाकिस्तानला क्षुल्लक डावपेच थांबवायला सांगू इच्छितो. काश्मीर नेहमीच भारताचा भाग असेल,असेही केजरीवालांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, 1990 साली जी स्थिती होती तीच स्थिती आज पुन्हा काश्मिरात निर्माण झाली आहे. भाजप काश्मीर हाताळू शकत नाही, त्यांना फक्त गलिच्छ राजकारण कसे करायचे हे माहित आहे. कृपया काश्मीरवर राजकारण करू नका,” असे केजरीवाल यांनी यावेळी नमूद केले.
काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्याच्या आपल्या योजनेबद्दल केंद्राने जनतेला महिती द्यावी, काश्मिरी पंडितांसोबत केलेले बॉण्ड रद्द करावेत ज्यामध्ये ते काश्मीरबाहेर काम करू शकत नाहीत, त्यांच्या अन्य सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना सुरक्षा द्यावी, असे केजरीवाल म्हणाले.काश्मीरात दहशतवाद्यांनी एकाच महिन्यात आठ गैरमुस्लिमांच्या हत्या केल्या आहेत.
एक बॅंक कर्मचारी आणि एक वीटभट्टी मजूर यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राहुल भट नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी ठार मारले. तर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आणखी एक मजूर जखमी झाला.
जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेची 31 मे रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
18 मे रोजी दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे एका वाईन शॉपमध्ये घुसून ग्रेनेड फेकले होते, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. या खेरीज पोलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी यांची 24 मे रोजी श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर टीव्ही कलाकार अमरीन भट यांची दोन दिवसांनी बडगाममध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती हे सारे भयानक प्रकारचे हत्याकांड आहे असेही त्यांनी नमूद केले.