नवी दिल्ली – करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशात फेस मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता वाढावी याकरिता या दोन वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात या वस्तूंचे उत्पादन मुबलक झाल्यामुळे आता केंद्र सरकारने या दोन वस्तूंना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले आहे.
13 मार्च रोजी या दोन वस्तूंचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात कंपन्यांनी या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. आता भारतातील बऱ्याच कंपन्या या दोन वस्तूंची निर्यात करू लागल्या आहेत. आम्ही सर्व राज्य सरकारशी चर्चा करून या संदर्भात हा निर्णय घेतला आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी सांगितले. मात्र, सरकारचे परिस्थितीवर बारीक लक्ष असून जर गरज वाटली तर या संदर्भात आगामी काळात हस्तक्षेप करण्यात येईल.