मुंबई – देशात करोनाच्या रुग्णांमध्ये अद्यापही हवी तशी घट होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात देशभरात करोनाचे 2 लाख 35 हजार 532 नवे रुग्ण मिळाले आहेत तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत दिवसागणीत वाढ होताना दिसून येत आहे.
तर महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे. त्याच दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
या चर्चांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांशी बोलतांना आपलं मत स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले,’ आतापर्यंत सर्व निर्णय डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा पॅन्डेमिक संपलेलं आहे असं कुठेही सांगितलेलं नाहीये. आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत असले तरी ओमायक्रॉन किंवा कुठलाही व्हेरिएंट हा वीक किंवा स्ट्राँग आहे, व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल तर आतापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.’ असं म्हणत त्यांनी राज्यातील मास्कची सक्ती हटवली जाणार नाहीये हे स्पष्ट केले आहे.