मुंबई – मुंबईहून चिपळूणकडे येणाऱ्या मारुती इको कारची रेलिंग गार्डला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (ता.3) सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी गावाजवळ झाला.
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने येताना इको कारने महामार्गाच्या कडेला असणाऱ्या रेलिंग गार्डला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, रेलिंग कारच्या आरपार घुसले होते. या धडकेत कारचे इंजिन देखील फुटले आहे.
कारमधील सर्वजण मुंबईहून सावर्डे चिपळूण येथे निघाले होते. गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. चालकांनी गाडी चालवताना नशा न करणे, मानसिक संतूलन व्यवस्थित नसेल तर गाडी न चालवणे, झोप येत असल्यास गाडी न चालवणे, वेगमर्यादा नियंत्रित ठेवणे या गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.