भारत मातेच्या वीरपुत्रास अखेरचा निरोप देण्यास लोटला जनसागर
कुटुंबीयांच्या आर्त आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले
खटाव- भारतीय सैन्य दलातील खटाव ता.खटाव येथील जवान अजिंक्य कृष्णा राऊत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पार्थिव खटाव येथे येण्यास रात्री उशीर झाल्याने जवान अजिंक्य यांच्या पार्थिवाची’ भारत माता की जय’ , ‘जवान अमर रहे’ जबतक सुरज चॉंद रहेगा’.अशा जयघोषत गावातून मिरवणूक (अंत्ययात्रा) काढण्यात आली. लोकप्रतिनिधी, लष्करी व पोलीस अधिकारी व कर्मचारी व सर्व देशप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.गावामध्ये सडा रांगोळी काढून चौका चौकात श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.
सिकंदराबाद येथून जवान अजिंक्य यांचे पार्थिव थेट त्यांच्या गावातील निवासस्थानी नेण्यात आले.जवान अजिंक्य यांच्या अंत्यदर्शनाला खटाव व परिसरातील जनसागर लोटला होता. यावेळी वीर जवान अजिंक्यच्या कुटुंबीयांनी फोडलेला आर्त टाहो पाहून प्रत्येकाचे हृदय पिळवटून जात होते व आश्रूंचा बांध फुटत होता.अंत्ययात्रेसाठी रात्री अकरा वाजले होते तरी देखील खटावकर जवान अजिंक्यच्या पार्थिवाला श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी रास्त्यावर व आपल्या घराच्या छतावर उपस्थित राहून ग्रामस्थ श्रद्धांजली वाहत होते व अंत्यदर्शन घेत होते.
अंत्ययात्रे पश्चात जवान अजिंक्य यांचे पार्थिव येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरातील नियोजित ठिकाणी आणन्यात आले.यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते,खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे उपसरपंच अमरसिंह देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी जि.प.सदस्य अशोकराव कुदळे, सर्व ग्राप.सदस्य, आजी माजी संघटनेच्या वतीने कॅप्टन बबनराव धुमाळ, जयहिंद फौंडेशनच्या खटाव तालुका अध्यक्ष हेमलता फडतरे, छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या वतीने मनोज देशमुख, रमेश नांगरे, बबनराव घाडगे, केशवराव पाटील विकास सेवा सोसायट्या वतीने महेंद्र देशमुख,अपंग विकास संघटनेच्या वतीने शिवसेना नेते आमिन आगा व नाईक सुभेदार भरत धुमाळ, महसूल विभागाच्या वतीने ग्राम तलाठी धनंजय तडवळेकर, पोलीस अधीक्षक गणेश किद्रे,एपीआय शितोळे व पोलीस कर्मचारी, सिकंदराबाद कमांड अॉफिसर व चिफ अॉफ द आर्मी स्टाफ व ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
सैन्य दलाच्या नियमानुसार अंत्यविधीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज जवान अजिंक्य यांचे पिता कृष्णा राऊत यांच्या कडे सर्वांसमक्ष सुपूर्द करण्यात आला.तदपश्चात वीर जवान अजिंक्य यांच्या पार्थिवाला सैन्य दलाच्या जवानांकडून शासकीय नियमानुसार आपल्या रायफलीतून तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली व शोकधून वाजवून मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पीत करण्यात आली.त्यानंतर जवान अजिंक्य यांच्या पार्थिवास पिता कृष्णा राऊत व भाऊ अक्षय यांच्या हस्ते अग्निसंस्कार करण्यात आला.
कुटूबियांच्या हृदयद्रावक आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावून जात होतं.सर्व विधी पार पाडण्यास मध्यरात्र झाली होती तरी ही भारत मातेच्या वीरपुत्रास अखेरचा निरोप देण्यासाठी खटाव परिसरातील रस्ते अक्षरश: जनमय झाले होते. त्यांच्या अकस्मित निधनाने व एक उमदा, होतकरू नवयुवक आपल्यातून कायमचा हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर सून्न होऊन सर्वत्र शोककळा पसरली आहे.