पुणे : मराठी भाषा दिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज या वारसादर्शन फेरीचे आयोजन केले होते. साहित्यिकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही तीर्थक्षेत्र असून त्यांना भेटी देत बुधवारी पुणेकरांनी त्यांचे कार्य आणि इतिहास जाणून घेतला.
कसबा पेठेतील कसबा गणपती मंदिराजवळ असलेल्या गोविंदाग्रजांच्या निवासस्थानी पिंपळ वृक्षाचे पूजन करुन सुरू झालेल्या फेरीचा समारोप सदाशिव पेठेतील कुसुमाग्रजांच्या जन्मस्थळाजवळ झाला. यावेळी साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. त्वष्टा कासार मंडळ, निंबाळकर तालिम मंडळ, आदर्श विद्यालय यांनीही उपक्रमांत सहभाग घेतला.
द. वा. पोतदार, नाट्यछटाकार दिवाकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असणाऱ्या स्थानांसह पुणे मराठी ग्रंथालयात आठवणी जागवण्यात आल्या. “गोविंदाग्रज, कुसुमाग्रजांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कविता वाचून आणि ऐकून आम्ही मोठे झालो. पुण्यामध्ये अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला पुढे नेण्याकरीता मोठे कार्य केले आहे,’ असे बर्वे म्हणाल्या.
“कुसुमाग्रजांचे निवासस्थान शोधण्यासाठी नीळकंठ गोडबोले यांनी पुढाकार घेतला. महानगरपालिकेत जाऊन तेथील नोंदी शोधून त्यांनी हे ठिकाण शोधून काढले. कुसुमाग्रजांसह सर्वच साहित्यिकांच्या कविता मनामनात रुजल्या आहेत. त्यामुळे अशा साहित्यिकांचे निवासस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. त्याची जपवणूक करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे,’ असे शेटे म्हणाले.