पुणे – लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर संबंधित महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ‘ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे दोघांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना २५ ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासाअंती पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अर्पणा अनिल अभंगे (वय २२, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल अभंगे याच्यासह एकाविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर्णा आणि अनिल यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून अपर्णाने अनिलपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, अनिलने पुन्हा अपर्णासोबत संसार करण्याचा तगादा लावला. दुसरीकडे प्रियकर अपर्णसोबत लग्न करण्यासाठी विचारणा करीत होता. त्यामुळे दोघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून २५ ऑगस्टला अपर्णाने गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर यांनी दिली आहे.