आळंदी -करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लग्नसोहळा अगदी मोजक्या मंडळींसह उरकला जात होता; पण आता 50 मंडळींसह लग्नसोहळा उरकण्यास सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र, आळंदी शहरात खेड तालुक्याबाहेरील लग्नसोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
अलंकापुरीत 500 पेक्षा अधिक धर्मशाळा व छोट्या-मोठ्या कार्यालयात मोठ्या उत्साहात लग्न सोहळे पार पडतात; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात लग्नसोहळ्यास परवानगी नाकारण्यात आली होती. आता करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून 50 लोकांच्या उपस्थितीची लग्नकार्यास परवानगी दिली आहे.
मात्र, जिल्हा अथवा खेड तालुक्याबाहेरील नागरिक आळंदी शहरात लग्न करू शकत नाही, तसेच आळंदी शहरात बाहेरून आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना होम किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचे आदेश प्रांत अधिकारी संजय तेली यांनी आळंदी नगरपरिषदेला दिले आहेत. त्यानुसार आळंदीतील सर्व धर्मशाळा व मंगलकार्यालयांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिली.