वरपित्यांपुढे प्रश्न; मुलींच्या अनेक अटींमुळे मुलांची होतेय अडचण
पुसेगाव – जुने चित्रपट आणि जुनी गाणी किती काळानुरूप मिळतीजुळती आहेत हे नव्याने सांगायलाच नको. आता हेच बघा आनंद शिंदे यांचे लोकप्रिय झालेल्या “पैसा देणे घेणे पटत नाही मनाला, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला’ या लोकगीताची आठवण नव्याने आल्याशिवाय राहत नाही. याउलट आता मुलीलाच हुंडा देऊन लगीन गाठ बांधण्याची वेळ मुलावर येऊन ठेपली आहे. असे असले तरी मुलींच्या असंख्य अटींमुळे मुलांच्या नशिबात मात्र निम्मे आयुष्य संपले तरी विवाहयोग दिसत नाहीत.
हीच परिस्थिती पंधरा-वीस वर्षांपूर्वी वेगळी होती. मुलगी वयात आली की, तिचा विवाह जमविण्यासाठी वधूपित्याला वरपित्याचे उंबरठे झिजवावे लागत असे. शिवाय भरमसाठ हुंडा, दागिने, चैनीच्या वस्तू आणि विशेष म्हणजे विवाहाचा सगळा खर्च वधूपित्याला करावा लागायचा. आपल्या विवाहासाठी आपल्या वडिलांना किती त्रास सहन करावा लागत आहे. प्रसंगी विवाहाच्या खर्चासाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, जमिनी गहाण ठेवाव्या लागत आहेत, विकाव्या लागत आहेत अशा अनेक विचारांनी अनेक मुलींनी आत्महत्यासारखे पाऊल उचलले. आता मात्र हळूहळू परिस्थिती बदलली आणि जो रुबाब वरपित्याचा होता तोच रुबाब आता वधूपित्याचा आहे. मुलाच्या लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी त्यांनी घातलेल्या अटींनी मुलाचा अपेक्षाभंग होत आहे.
सध्या खेडेगावांमध्ये पस्तिशी ओलांडलेली असंख्य मुले आहेत. वयाच्या पंचविशीपासून सुरू असलेला वधू पाहण्याचा कार्यक्रम आजतागायत सुरूच आहे. अनेकांनी तर लग्न जमविण्याचा विचारच सोडून दिला आहे. कारण पस्तिशी गाठलेल्या नवरोबाला तिशीची नवरी मिळणे त्याहून कठीण झाले आहे. असे असले तरी सध्या लातूर, बीड, उस्मानाबाद आदी भागातील मुलींचे विवाह पैसे घेऊन जमवण्याचा ठेका अनेक मध्यस्थींनी घेतला आहे. मात्र लग्न जमवताना नवऱ्या मुलांकडून मोठी रक्कम, दागदागिने घेतले
जातात आणि लग्न होताना किंवा लग्न झाल्यावर मुलगी पलायन करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात वर पक्षाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. एकंदरीत मुलींचा घटता जन्मदर आणि वधूपक्षाच्या असलेल्या अपेक्षा यामुळे अनेक मुलांना विनालग्नाचेच राहावे लागणार आहे.
मुलीच्या अन् तिच्या पालकांच्या अपेक्षा
मुलाला मोठ्या पगाराची खासगी किंवा सरकारी नोकरी असावी. मुलगा शहरात राहणारा असावा. शहरात त्याच्या मालकीचा प्लॅट असावा. गावाकडे मुलाला किमान चार- पाच एकर जमीन असावी. मुलगी शेतात काम करणार नाही. मुलगा निर्व्यसनी असावा. त्याच्याकडे चारचाकी गाडी व बॅंक बॅलन्स असावा.