विवाहविम्याच्या अंतरंगात… (भाग-१)
विवाह रद्द झाल्यास : वेडिंग इन्शूरन्समध्ये विवाहाचा कार्यक्रम रद्द होणे किंवा त्यात अडचणी येणे, विवाहस्थळी नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होणे यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. विवाह सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेची हानी (व्यासपीठ, वॉर्डरोब, सोफासेट तसेच भाड्याने घेतलेले सामान) झाल्यास भरपाई मिळते. कार्डाची छपाई, डेकोरेशन, ऍडव्हान्स रुम,ट्रॅव्हल्स बुकिंगमध्ये झालेल्या खर्चाची भरपाई मिळते. भूकंप, वादळ, पाऊस यापासूनही कवच मिळते.
कंपनीपासून कोणतिही गोष्ट लपवू नका : विमा उतरवताना एखादे तथ्य लपविले असेल आणि खोटे दावे केले तर त्यावर भरपाई मिळत नाही. विवाहात कोण कोण सहभागी होणार आहे. किती लोक येणार, निमंत्रणांची प्रत, विवाहाची वेळ आदी गोष्टी सांगणे अपरिहार्य आहे. जर विवाहाचे ठिकाण बदलले तर त्याची माहिती देखील विमा कंपनीला द्यावी लागते. विवाहाच्या ठिकाणी असलेले डेकोरेशन, स्टेज, ज्वेलरी आदींवर होणाऱ्या खर्चावर विम्याची रक्कम निश्चित होते. विमा कपन्या आपल्याला अनेक पर्याय देऊ शकतात. जर आपल्या बजेटनुसार आपण त्या पर्यायाची निवड करू शकता.
वैयक्तिक वाद असल्यास भरपाई नाही : विवाहादरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी, मारामारी, वादविवाद झाले आणि त्यामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याची भरपाई देत नाही. निष्काळजीपणा किंवा गुन्हगारी प्रवृत्तीकडून लग्नात बाधा आणली गेली असेल किंवा घटना घडली तर त्यापासूनही विमा कवच मिळत नाही.
दरवर्षी खर्चात वाढ : भारतात विवाहाचा बाजार हा एक लाख कोटी रुपयाचा आहे. दरवर्षी त्यात 25 टक्क्यांने भर पडत आहे. आता सामान्य विवाहात दहा लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च होत आहेत. विशेषत: महानगरात आणि दाट वस्तीत विवाह सोहळ्याचे आयोजन करणे जोखमीचे ठरू लागले आहे.
पॉलिसीसाठी पात्रता : विमा उतरवणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 असणे गरजेचे आहे. तो भारतीय नागरिक असावा.
लक्षात ठेवा
वेडिंग इन्शूरन्समध्ये कशा प्रकारचे कवच मिळेल, हे जाणून घ्या.
जोखीम उचलण्यास आपली पॉलिसी सक्षम आहे का?
सोहळा अचानक रद्द होणे याचा समावेश पॉलिसीत असणे गरजेचे आहे.
आग लागणे, चोरी यासाठी आपण वेगळी पॉलिसी घेऊ शकता.
आपल्याकडे ज्वेलरी इन्शूरन्स असेल तर वेडिंग इन्शूरन्समधून त्याला वगळा.
व्यक्तिगत दुर्घटना, आरोग्य विमा असेल तर त्याचा वेडिंग इन्शूरन्समध्ये समावेश करू नका.
पुढील प्रकरणी दावा नाही
दंगल, अपहरण, संप या कारणावरून विवाह रद्द झाल्यास विमा संरक्षण मिळत नाही.
विवाह स्थळी पॉलिसीधारक उशिरा पोचल्यास दावा मिळत नाही.
आत्महत्या, किंवा स्वत:कडून झालेला हिंसाचार आणि युद्ध, दहशतवादी हल्ला या कारणाने मृत्यू झाल्यास दावा मिळत नाही.