रांजणी येथील घायतडके कुटुंबाचा आदर्श
मंचर – विवाहाच्या गंध कार्यक्रमासाठी वऱ्हाडी मंडळी आली. आणि गंधाच्या कार्यक्रमातच विवाह केला. त्यामुळे वेळ, पैसा वाचवून रांजणी (ता. आंबेगाव) येथील घायतडके कुटुंबाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
रांजणी गावातील सहादू महादू घायतडके यांचे चिरंजीव सचिन यांचा माळेगाव पठार ( ता. संगमनेर) येथील काशिनाथ नाथा खरात यांची कन्या जयश्री हिच्याशी विवाह जुळून आला. विवाहनिश्चिती म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी रविवारी (दि. 17) माळेगाव पठार येथे साक्ष गंधाचा कार्यक्रम आयोजित केला. सर्व पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार पाहुण्यांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
रांजणी ते माळेगाव पठार या गावांमधील अंतर जवळपास 75 ते 80 किलोमीटर आहे. यावेळी नवरदेवाचे बंधू संदीप घायतडके, किरण घायतडके, दिनेश गौतम भालेराव यांनी गंधाच्या कार्यक्रमात विवाह उरकून टाकण्याविषयी चर्चा केली. त्यावर दोन्हीही कुटुंबीयांनी आपापसांत चर्चा करुन सहमती दर्शवली.
शुभमुहूर्तावर बौद्ध धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे मंगल परिणय झाला. उपस्थित वऱ्हाडी मंडळी, रांजणी ग्रामस्थांनी, पाहुण्यांनी घायतडके कुटुंबाचे कौतुक केले. सध्याच्या धावपळीच्या युगात हा आदर्श सर्वांना प्रेरणादायी ठरला आहे.
गंधाच्या कार्यक्रमासाठी अलिकडे वारेमाप खर्च केला जातो. या खर्चात एखाद्या गरिब कुटुंबातील विवाह देखील संपन्न होईल. वेळ, पैसा वाचविण्यासाठी यापुढे असे झटपट विवाह होणे गरजेचे आहे.
– सचिन घायतडके, नवरदेव