लॉकडाऊनचा परिणाम; कार्यालयांसमोर अडचणींचा डोंगर
पिंपरी – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभासाठी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी असल्याने गेल्या पाच महिन्यांमध्ये बरेच लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. तर, ज्या लग्नसोहळ्यांची तारीख निश्चित झालेली होती त्यांनी घरगुती स्वरुपात किंवा छोटे हॉल घेऊन लग्न सोहळे उरकुन घेतले. लग्न समारंभासाठी केवळ 50 व्यक्तींच्या मर्यादेत मोठी मंगल कार्यालये भाड्याने घेणे परवडणारे नसल्याने बरीच कार्यालये सध्या वापराशिवाय पडून आहेत. थकलेले बॅंकांचे हप्ते, वीज बिल, मिळकतकराचा वाढत चाललेला बोझा यामुळे कार्यालयांसमोर अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे.
करोना संसर्गामुळे देशभरात 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला. लॉकडाऊनपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काही लग्न सोहळे उरकले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सुरवातीची दोन महिने मंगल कार्यालये बंदच होती. त्यामुळे एप्रिल आणि मे हे लग्नसराईचे दोन महिने वाया गेले. लॉकडाऊननंतर दोन महिन्यांनी राज्य सरकारने मंगल कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली.
50 व्यक्तींच्या उपस्थितीतच हे लग्नसोहळे घेण्यास परवानगी आहे. मंगल कार्यालयांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, त्यांच्यासमोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. छोट्या मंगल कार्यालयांमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही लग्नसोहळे झाले. मात्र, केवळ 50 लोकांमध्ये लग्नसोहळे करायचे असल्याने होणाऱ्या देखभाल खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले.
मोठी मंगल कार्यालये ओस
सध्या लॉनसहित असलेली मोठी मंगल कार्यालये तर अक्षरश: ओस पडली आहेत. ही कार्यालये पूर्ण तोट्यात आहेत. कार्यालयांच्या देखभालीसाठी महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत असताना उत्पन्नाचे मार्ग मात्र बंद झाले आहेत. मोठ्या मंगल कार्यालयांना एका लग्नामागे साधारण एक लाख रुपये इतका नफा मिळतो. छोट्या कार्यालयांना एका लग्नामागे 50 हजारांपर्यंत नफा मिळतो. केटरिंगची व्यवस्था वेगळी असते. केवळ 50 लोकांसाठी मोठी मंगल कार्यालये भाड्याने देणे परवडत नसल्याने चालकांसमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. बॅंकांचे हप्ते, मिळकतकराचा वाढत चाललेला बोझा, वीजबिल मात्र कमी झालेले नाही.
मंगल कार्यालये सध्या पूर्णत: तोट्यात सुरू आहेत. लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांना परवानगी आहे. देखभाल खर्चासाठी महिन्याला एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होतो. तुलनेत 50 लोकांसाठी कार्यालय भाड्याने देणे परवडत नाही. बॅंकांचे आठ-आठ हप्ते थकले आहेत. लग्न समारंभाला 500 लोकांना परवानगी दिल्यानंतरच कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरू होऊ शकतील.
– तात्यासाहेब आहेर, मंगल कार्यालयाचे मालक