नवी दिल्ली (वंदना बर्वे) – मुलींनी लग्न कधी करायचं…. मुलांना जन्माला कधी घालायचं… कधी काय करायचं.. हे सगळं आता मोदीजी ठरविणार, असा उपरोधिक टोमणा मारत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले आहे. मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या महिला खासदारांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या लग्नाचे वय 18वरून 21 करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुलींच्या लग्नाच्या वयात बदल करण्यासाठी सरकार विद्यमान कायद्यामध्ये संशोधन करणार आहे.
या निर्णयावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील महिला खासदारांमध्ये “तू-तू, मै-मै’ सुरू झाली आहे. विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी सरकारच्या या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. तर, अमरावतीच्या भाजप समर्थित अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, केंद्र सरकार जे काही निर्णय घेत आहे ते महिलांना न विचारता घेतले जात आहेत. मतदानाचे वय 18 आहे तर मग लग्नाचे वय 21 का? या देशात काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही. आता सगळं काही सरकार ठरविणार आहे. मुलींनी लग्न कधी करायचे? मुलं कधी जन्माला घालायची? हे सगळं जर सरकार ठरविणार असेल तर मग महिलांनी कोणता निर्णय घ्यायचा? बालविवाहाची प्रकरणेही फार वाढली आहेत.
तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी सरकारला उपरोधिक टोमणा मारला. तसेच कॉंग्रेस खासदार छाया वर्मा यांनीही सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, सरकारकडे आता बहुमत आहे. मग सरकार लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा कायदा का आणत नाहीत? महिलांचे निर्णय महिलांनाच घेवू दिले पाहिजे. विधेयक आणून महिलांना शक्ती दिली पाहिजे. मात्र, सरकार आपल्या निर्णयाचे पालन करण्यासाठी जबरदस्ती करीत आहे’.
नवणीत कौर राणा म्हणाल्या, सरकारच्या या निर्णयामुळे मुलींना जास्त अधिकार मिळतील. लग्नाचा, शिक्षणाचा निर्णय त्या स्वत: घेवू शकतील. यासाठी समाजाने तयारी दाखविली पाहिजे. ही बाब रूजायला थोडा वेळ लागेल. लग्नाचे वय 16हून 18 केले गेले तेव्हा सुध्दा विरोध झाला होता. आताही होईल. परंतु, बदल स्वीकारला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.