पुणे – करोना प्रादुर्भाव सुरू होताच लॉकडाऊनआधीच मंगलकार्यालय, लॉन्स, गार्डन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मंगल कार्यालये सुरू झाली. मात्र, तोपर्यंत लग्नसराईचे मुहुर्त संपले. आता पुन्हा लग्नसराई सुरू होत असतानाच पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये केवळ 50 लोकांना परवानगी असल्यामुळे मोठे लॉन्स, गार्डन, बॅन्क्वेट हॉल यांचे मार्च ते मे मधील बुकिंग रद्द होऊ लागले आहे. आधीच वर्षभर बुकिंग नाही, त्यात पुन्हा बुकिंग रद्द होत असल्याने मंगल कार्यालय व्यवस्थापनाचे कंबरडे मोडले आहे.
करोनाच्या पार्श्वभुमीवर मार्च ते ऑक्टोबर 2020 अखेरपर्यंत मंगल कार्यालये बंद होती. त्यानंतर लग्न सोहळ्यांना 50 लोकांचीच परवानगी देण्यात आली. हळूहळू ही संख्या कागदोपत्री जरी वाढली नसली तरी अप्रत्यक्षपणे लग्नसोहळ्यांना 500 ते हजारांच्या घरात लोकांची गर्दी झाली. त्यावेळी करोना संसर्ग कमी होत असल्यामुळे प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले नाही. कारण, करोनामुळे सर्वांवरतीच आर्थिक कुऱ्हाड कोसळली होती. ती पूर्वपदावर येण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असून, मागील तीन महिन्यांत परिस्थिती सुधारत नाही, तोच फेब्रुवारीच्या 2021 पहिल्या आठवड्यापासून शहरातील करोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे महापालिकेकडून निर्बंध घालत पुन्हा लग्नसोहळ्यासाठी 50 लोकांचीच परवानगी देण्यात आली. मात्र, त्यामध्ये मोठे लॉन्स, गार्डन, बॅन्क्वेट हॉल यांचे नुकसान होत आहे.
छोटा हॉल बरा…
50 लोकांमध्येच लग्न करायचे म्हटल्यावर लॉन्स किंवा बॅन्क्वेट हॉल कशासाठी बुकींग करायचे, असा विचार करून नागरिक छोटा हॉल किंवा घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत लग्नसोहळा पार पाडतात. त्यामुळे एक हजार ते पाच हजार क्षमतेचे असलेले लॉन्स, गार्डन, हॉल बंद करण्याची वेळ आली आहे. कारण, हे हॉल घायचे म्हटल्यावर त्याचे व्यवस्थापनासाठीच शंभर व्यक्ती लागतात. लहान हॉलमध्ये जरी लग्न घ्यायचे म्हटले तरी आचारी, व्यवस्थापन असे मिळून 25 ते 30 लोक होतात. त्यामुळे 50 लोकांमध्ये लग्न करायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडतो.
मागील वर्षी ऐन लग्नसराईमध्ये लॉकडाऊन लागले आणि पूर्ण वर्ष कार्यालय बंद होती. यावर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून मार्च ते मे महिन्यातील बुकिंग सुरू झाले. मात्र, करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभावर असलेल्या निर्बंधामुळे बुकींग रद्द होत आहेत. तर काही व्यक्तींकडून चार महिन्यांनी परिस्थिती आटोक्यात येईल, या आशेने जुलै महिन्यातील बुकिंग करत आहे. मात्र, यामध्ये विचित्र परिस्थितीमुळे अधीच आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.
– श्रीपाल ओसवाल, अध्यक्ष, मंगल कार्यालय असोसिएशन