कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या योग्य नियोजनाअभावी विकास रखडला
बाजारपेठांना अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा विळखा
पुणे – ब्रिटिशकालीन बाजारपेठ ते आधुनिक प्रकारची वस्त्र, विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या अनेक बाजरपेठा लष्कर परिसरात आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी बाजारपेठांचा विकासदेखील रखडला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधील या बाजारपेठा नवसंजीवनीच्या प्रतिक्षेत आहेत.
ब्रिटिशकाळापासून प्रचलित असलेले शिवाजी मार्केट, पाश्चिमात्य कपडे, वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणाईकडून सर्वाधिक पसंती दिली जाणारे फॅशन स्ट्रीट, ऐतिहासिक महात्मा गांधी रस्ता, वानवडी बाजार अशा विविध बाजारपेठा लष्कर परिसरात आहेत. मात्र, या बाजारपेठांना अतिक्रमण आणि अस्वच्छतेचा विळखा बसत आहे. इतकेच नव्हे तर, कॅन्टोन्मेंट बोर्डांकडून या बाजारपेठांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने बाजारपेठांचा विकास रखडला असून, त्यांची स्थिती अधिकच खालावत आहे. याबाबत बोर्डाच्या विविध बैठकांमध्ये लोकप्रतिनिधींकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. मात्र, अद्यापही बोर्ड प्रशासनाकडून यासाठी ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.
लष्कर परिसरातील बाजारपेठा या येथील नागरिकांसाठी फक्त गरजच नाही, तर त्या या परिसराच्या प्रतिष्ठेचाही विषय आहे. त्यामुळे या बाजारपेठांचे योग्य नियोजन झाले पाहिजे. बोर्ड प्रशासन स्वत: त्यांचे व्यवस्थापन करू शकत नसतील, तर आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यांचे व्यवस्थापन व्हावे, अशी मागणी नगरसेविका प्रियंका श्रीगिरी यांनी केली. मात्र, बोर्डाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, आऊटसोर्सिंग करणे शक्य नसल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले.
एकूणच योग्य नियोजन आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे कॅन्टोन्मेंटमधील बाजारपेठांची अवस्था बिकट झाली आहे. या बाजारपेठांचा योग्य विकास होणार का? असा प्रश्न परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
फॅशन स्ट्रीटला सुविधांचे वावडे
मूळ करारानुसार ठराविक दुकानांना, ठराविक वेळेत विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेल्या “फॅशन स्ट्रीट’ या बाजारपेठेतील अतिक्रमण वाढले आहेत. याविरोधात बोर्डाकडून कारवाई तर होते, परंतु ती तात्पुरत्या स्वरुपाची असते. त्यामुळे ती फारशी प्रभावी ठरत नाही. तर दुसरीकडे बाजारपेठेत पुरेशा सुविधा नाहीत. भाडेकरार पावती दिली जात नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून केली जाते. ही बाजारपेठ हटवून त्याजागी मॉलची उभारणी करावी, अशी मागणी बोर्डाच्या लोकप्रतिधींकडून नेहमीच केली जाते.
शिवाजी मार्केटला अतिक्रमणाचे ग्रहण
शिवाजी मार्केट ही वास्तू तर ब्रिटिशकालीन वास्तूशास्त्रानुसार उभारण्यात आलेली आहे. याठिकाणीदेखील काही गाळेधारकांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शिवाजीमार्केटमधील अनधिकृत गाळेधारकांची संख्यादेखील सातत्याने वाढत आहेत. तसेच, येथील विक्रत्यांकडून टाकला जाणारा कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, वाहतूक कोंडी यामुळे बाजारपेठेचे मूळ स्वरूपच बदलत आहेत.
उत्पन्नाअभावी रखडलाय बाजारपेठांचा विकास
कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक बाजारपेठा या जुन्या कराराअंतर्गत स्थापन करण्यात आल्या आहेत. साहजिकच या बाजारपेठांमधील दुकाने ही जुन्या करारांतर्गत भाडेतत्वावर देण्यात आली आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या भाडेकरारात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे बोर्डाला यामधून फारसे उत्पन्न मिळत नाहीत तर, दुसरीकडे या बाजारपेठांच्या परिसरात वाढत्या अतिक्रमणांमुळे बोर्डाच्या सुविधांवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे बाजार पेठांचा विकास रखडला आहे.