पुणे – जिल्ह्यासह विभागात सुरू असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा, भेंडी, गवार, हिरवी मिरची, सिमला मिरची, प्लॉवर, कोबी, शेवगा,
बीट, घेवडा, भुईमूग शेंग आणि पावट्याच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
नवरात्रीमुळे राज्यातील कराड, मलकापूर भागांसह कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळांची आवक झाली. स्थानिक मटारचा हंगाम संपला आहे. सध्या इंदौर येथून मार्केट यार्डात मटारची आवक होत आहे. वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि ऑक्टोबर हिटचा मटारच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे मटारच्या भावातही किंचितशी घट झाल्याचे आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
परराज्यातून आलेल्या मालामध्ये इंदौर येथून 5 टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून 4 टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरात येथून 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा 2
टेम्पो, बेळगाव येथून 1 टेम्पो रताळी, तर, बेंगळुरु येथून 1 टेम्पो आले, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून 7 ते 8 ट्रक लसणाची आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 गोणी, कोबी सुमारे 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरची 7 ते 8 टेम्पो, टोमॅटो 9 ते 10 हजार पेटी, भुईमूग शेंगा सुमारे 100 गोणी, घेवडा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, कांद्यामध्ये जुना 60 ट्रक, तर नवीन कांद्याची 300 पोती, इंदौर, आग्रा आणि स्थानिक मिळून बटाट्याची 30 ट्रक आवक झाली.