बाजार आवारातील गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाचा निर्णय
पुणे – मार्केटयार्डात उद्या (दि. 1) पासून फक्त चारशे वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर ठेवण्याची गरज आणि बाजार आवाराची क्षमता यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी, शेतकर्यांनी आवश्यकतेनुसार शेतमालाची तोड करून बाजारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले आहे.
देशमुख म्हणाले, जिल्ह्यासह राज्य तसेच परराज्यातून आलेल्या चारशे वाहनांना यापुढे बाजारात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आडते व शेतकर्यांनी नियोजन करत शेतमाल बाजारात आणावा. आडत्यांनी शेतकर्यांशी चर्चा करून शेतमालाची आवक सुरळीत राहील यादृष्टीने प्रयत्न करावे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यास त्याची जबाबदारी अतिरिक्त वाहने आणणार्यांची राहिल असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मंगळवारी भुसार विभागात 100 गाड्यांची आवक झाली. तर, भाजीपाला विभागात 430 गाड्यांमधून भाजीपाला बाजारात दाखल झाला. उपबाजार व मुख्य बाजार धरून 720 गाड्यांची आवक होऊन 20 हजार क्विंटल शेतमाल शहर परिसरात विक्रीसाठी पाठविण्यात आला.