पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारातील कामकाजावर परिणाम झाला असून करोनाबाधित भागातील कामगार, आडते, व्यापाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश करण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला आहे.याबाबतचे आदेश देण्यात आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटना तसेच कामगार संघटनेने अशा परिस्थितीत काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बाजाराचे कामकाज तूर्तास बंद ठेवण्यात यावे, अशी विनंती बाजार समितीकडे करण्यात आली आहेत.
ज्या भागात पोलिसांनी कडक निर्बंंध घातले आहेत.त्या भागात मार्केटयार्डातील ६० ते ७० टक्के आडते, व्यापारी, कामगार, टेम्पोचालक वास्तव्यास आहेत. करोनाचा संसर्गामुळे बाधित भागातून बाजार समितीच्या आवारात येणाऱ्यांना मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत काम करणे योग्य ठरणार नाही. याबाबत बुधवारी आडते संघटेकडून बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती आडते संघटनेचे सचिव रोहन उरसळ यांनी दिली.
करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर बाजार पुन्हा सुरू करावा तसेच भाजीपाला विक्रीची पर्यायी व्यवस्था बाजार समितीकडून शहरात करण्यात आल्यास टंचाई भासणार नाही, असे त्यांनी नमूद केले.श्री छत्रपती शिवाजी मार्केट कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटना तसेच टेम्पो संघटनेकडून प्रशासक देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.करोनाचा संसर्ग वाढत आहे.कामगार, हमाल, टेम्पोचालक करोनाचा संसर्गामुळे भयभीत झाले आहेत.अशा परिस्थितीत काम करणे शक्य नाही, असे त्यांनी नांगरे यांनी सांगितले.