मुंबई – सरलेल्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने विविध क्षेत्रात प्रवेश करून भांडवल उभारणी केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. परिणामी भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 19 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
बुधवारी या कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी वाढून 2,827 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. मार्च महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य 18 लाख कोटी रुपये झाले होते. एप्रिल संपन्याअगोदर त्यामध्ये एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
13 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य 17 लाख कोटी रुपये होते. चालू वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव तब्बल 19 टक्क्यांनी वाढला आहे. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे मार्जिन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर दूरसंचार आणि हरित ऊर्जा क्षेत्रात कंपनी वेगाने काम वाढवत आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव वाढत असल्याचे स्वस्तिका इन्वेस्टमेंट या कंपनीचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्यूचर रिटेलमधील कंपन्या विकत घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षात केला. मात्र यामध्ये बऱ्याच गुंतागुंतीतून वाढल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्युचर रिटेल विकत घेण्याचा इरादा सोडून दिला आहे. मात्र इतर क्षेत्रात कंपनीचे काम वेगाने वाढत आहे.
महागाईचा परिणाम नाही
महागाई आणि जागतिक पातळीवरील तणावामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार व्यवसायावर कसलाही परिणाम झाला नाही. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज रिटेल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आगेकूच करीत आहे. या कारणामुळे आगामी काळात या कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते.