इंदापूर तालुक्यातील वास्तवता : नोटाबंदी, जीएसटी, अवकाळीमुळे परिणाम
गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील मोठ्या गावांतील बाजारपेठेवर मंदीची छाया व्यापून गेली आहे. तालुक्यातील सहा ते सात बाजारपेठांची साधारण शंभर ते दीडशे कोटी रुपयांची उलाढाल आहे. यंदा किमान 50 टक्के घट झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या मोठ्या बाजारपेठेत मंदीची लाट सुप्तावस्थेत आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने व्यापारी आणि विक्रेत्यांना ग्रासले आहे. नोटाबंदी, जीएसटी, अवकाळीमुळे दूरगामी परिणाम झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील स्थिती भयावह झाली आहे.
नोटाबंदीपासून इंदापूर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील उलाढाल मोठ्या प्रमाणात मोडकळीस आली आहे. त्यामुळे तालुक्यातील व्यापारपेठमधील आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील अर्थकारण पूर्णतः कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने शेतकरी पाण्याविना अडचणीत सापडला होता. यंदा अवकाळी, परतीचा पाऊस हा वादळी वाऱ्यासह झाल्याने द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. नोटाबंदी, वादळी वाऱ्यासह अवकाळी परतीचा पाऊस त्यातच दुष्काळ आणि आणि व्यापाऱ्यांवर जीएसटीचा बोजा आदी चारी बाजूने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना घेरले आहे.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, वालचंदनगर, लासुर्णे, निमगाव केतकी, सणसर, भिगवण आदी गावांत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. यामध्ये भवानीनगर व्यापारपेठमध्ये वर्षाकाठी पाच ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. वालचंदनगर बाजारपेठमध्ये पाच ते दहा कोटी रुपये, लासुर्णे बाजारपेठमध्ये पंधरा कोटी ते वीस कोटी रुपये, निमगाव केतकी 30 ते 35 कोटी, सणसर येथील बाजारपेठेत पाच ते दहा कोटी रुपये, भिगवण येथे 30 ते 40 कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल होत आहे. यंदा मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने वर्षभर मरगळलेला
दिसणार आहे.
भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. साधारण 15 ते 20 गावांचा संपर्क बाजारपेठेशी येत आहे. वालचंदनगर हे गाव इंडस्ट्रीज एरिया म्हणून ओळखला जाते. त्याही ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. लासुर्णे हे गाव बारामती इंदापूर रस्त्यावर असल्याने त्याही ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. बारामती- इंदापूर रस्त्यावरील निमगाव केतकी हे गाव मोठ्या प्रमाणात परिसरात वसलेले आहे. याही ठिकाणी बाजारपेठ
मोठी आहे.
सणसर येथील आठवडे बाजार आणि बाजारपेठ ही नावाजलेली आहे. इंदापूर तालुक्यातील तालुक्याच्या खालोखाल समजली जाणारी पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण बाजारपेठ मोठी आहे. याठिकाणी मोठी उलाढाल कायमस्वरूपी सुरू असते. भिगवण हे रेल्वे स्टेशनचे जंक्शन असल्याने कायमच वर्दळ सुरू असते. परंतु तालुक्यातील हे सर्व मोठ्या प्रमाणातील गावातील बाजारपेठ दरवर्षी सुरळीत चालत होत्या. परंतु या बाजारपेठेत नोटाबंदीपासून मंदीची लाट आली. जीएसटीमुळे अनेक व्यापारी चक्रव्यूहात सापडले आहेत.
अस्मानी संकटाबरोबर शासननिर्मित धोरण
परतीच्या आणि अवकाळी वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात जर चार पैसे शिल्लकच राहिले नसतील तर बाजारपेठ कशा चालणार, हाच प्रश्न सध्या तालुक्यातील मोठ्या गावांतील बाजारपेठेतील व्यापारात पुढे पडलेला आहे. त्यामुळे शंभर ते दीडशे कोटी रुपयांच्या उलाढालीमध्ये यंदा मरगळ आली आहे. शंभर ते दीडशे कोटींवर इंदापूर तालुक्याची उलाढाल होत आहे. परंतु निसर्गाच्या संकटामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे तालुक्यातील जनता मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनत चाललेले आहे. बाजारपेठेमधील उलाढाल मंदावली आहे. मंदावलेल्या आणि मरगळलेल्या बाजारपेठेत पुन्हा सोनरी उलाढाल कधी येणार, याच आशेवर इंदापूर तालुक्यातील व्यापारी प्रतीक्षा करीत आहे.
अगोदर कोरडा दुष्काळ, सध्या ओला दुष्काळ पडला आहे. त्यात व्यापारपेठमधील व्यापाऱ्यांवर नोटाबंदीनंतर जीएसटीचा बोजा पडला आहे. या घटकांमुळे मंदीचे चित्र सगळीकडे दिसत आहे. जीएसटीमुळे खर्च वाढला असून नफा मात्र पूर्वी होता तेवढ्याच प्रमाणात होत नाही. त्यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडला आहे. निसर्गाची साथ मिळाली नाही. सरकारी धोरण लकव्यामुळे व्यापारी मोडकळीस आला आहे. हे चित्र सध्यातरी सगळीकडे दिसत आहे.
– विवेक काळे, किराणा मालाचे व्यापारी, भवानीनगर.