क्रिकेट हा खेळ केवळ फलंदाजांचा नाही
मेलबर्न – क्रिकेटचा खेळ हा काही केवळ फलंदाजांची मक्तेदारी नाही तर, गोलंदाजांनाही समान संधी मिळाली पाहिजे. लाळेच्या वापरावरील बंदीमुळे फलंदाज व गोलंदाज यांच्यातील संतुलन बिघडेल, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर याने व्यक्त केले आहे.
चेंडूची चमक टिकून राहावी यासाठी जगभरातील गोलंदाज लाळेचा वापर करतात. सध्या करोनाचा धोका असल्याने या लाळेच्या वापरावर बंदी लावण्यात आली आहे. मात्र, सामन्यापूर्वी खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे मग ही भीती कशासाठी. पुढील काळात जे सामने होतील त्यापूर्वी प्रत्येक खेळाडू, सपोर्ट स्टाफ या सगळ्यांचीच चाचणी घेतली जाईल. सुरक्षेच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचेही पालन करावे लागणार आहे. या सगळ्यात विनाकारण घाबरुन जात काही नियम तयार केले गेले आहेत. या बाबत आयसीसीने फेरविचार करावा, असे आवाहनही टेलर यांनी केले आहे.
एकदिवसीय किंवा टी-20 क्रिकेटबाबत एकवेळ ही बंदी ठीक वाटेल. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये या बंदीबाबत निश्चितच पुन्हा विचार केला जावा. कसोटीत चेंडू 80 षटके वापरला जातो. सुरूवातीची 40-50 षटके पूर्ण झाली की चेंडूची चमक टिकून राहात नाही. त्यावेळी खरेतर गोलंदाज किंवा सहकारी खेळाडू चेंडूच्या एका बाजुला लाळ लावून त्याची चमक टिकविण्याचा प्रयत्न करतात. आता यावर बंदी लावली गेल्याने फलंदाज व गोलंदाज यांच्यातील संतुलनच बिघडून जाईल, असेही टेलर म्हणाले.