लखनौ – येथील विशेष खासदार-आमदार न्यायालयाने माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांची मुलगी, माजी खासदार संघमित्रा मौर्य यांना एका व्यक्तीचा छळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणात फरार घोषित केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख २७ ऑगस्ट निश्चित केली आहे.
विशेष न्यायाधीश आलोक वर्मा यांनी ५ जुलै रोजी हा आदेश दिला, तर शुक्रवारी तो सार्वजनिक करण्यात आला. संघमित्रा यांचा पती असल्याचा दावा करणाऱ्या दीपक कुमार स्वर्णकर नावाच्या व्यक्तीचा छळ केल्याप्रकरणी मौर्य, संघमित्रा, आणि इतर तीन जणांना त्यांनी फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स व वॉरंट बजावूनही आरोपी न्यायालयात हजर झाले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, स्वर्णकरच्या तक्रारीवर सुनावणी करताना, न्यायालयाने पाच आरोपींविरुद्ध त्याच्यावर हल्ला करणे, कट रचणे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी प्रथमदर्शनी खटला केला जाऊ शकतो असे नमूद केले आहे.
तक्रारीत, पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या दीपकने आरोप केला आहे की संघमित्रा यांनी २०१९ च्या संसदीय निवडणुकीपूर्वी बौद्ध विधींनुसार त्याच्याशी दुसरे लग्न केले आणि निवडणुकीनंतर लोकांना याबद्दल सांगण्याचे आश्वासन दिले. पण निवडणुकीनंतर ती खासदार झाली आणि तेव्हापासून तिने आणि तिच्या वडिलांनी पोलीस आणि खाजगी गुंडांच्या मदतीने त्याचा छळ सुरू केला, असे दीपकने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ही कारवाई रद्द करण्यासाठी मौर्य आणि संघमित्रा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्या होत्या.