संदीप राक्षे
सातारा – वर्षानुवर्षे सातारकरांची तहान भागवणाऱ्या कास तलावाच्या धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला अनुदानाच्या “बूस्टर डोस’ची गरज आहे. प्रलंबित 17.79 कोटीच्या देयकाची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात निधी न मिळाल्याने प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सातारकरांना मार्च 2021 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कास धरण उंची वाढविण्याचा प्रकल्प माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना या प्रकल्पासाठी निधी देण्यात आल्याने काम सुरू झाले होते. मात्र, भाजपची सत्ता गेल्यापासून साताऱ्यातील विकासकामांचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा मंत्री असताना यांनीच कास धरण उंची वाढविण्याच्या मूळ प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर अनेक वर्षे हे काम सुरुच झाले नव्हते. भाजप सरकारच्या काळात काही प्रमाणात निधी मिळाल्याने हे काम सुरू झाले आणि सत्ताबदलानंतर ठप्प झाले.
त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी निधी देण्याची घोषणा करून दीड महिना उलटला तरी निधीचा प्रस्ताव पुढे सरकलेला नाही. किमान पहिल्या टप्प्यात 17.79 कोटींचा निधी तातडीने मिळावा असा जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे.
सातारकरांना वर्षभर वाट पहावी लागणार
कास धरणाची उंची वाढविण्याचे काम जवळपास 75 टक्के झाले आहे. आता सांडव्याजवळची विहीर, त्याचे टप्पे, 900 मीटर अंर्तगत जलवाहिन्यांची कामे, कंट्रोल युनिट अशी अनेक कामांना गती मिळालेली नाही. धरण परिसरातील यंत्रांची घरघर सुमारे वर्षभर बंद आहे.
2009 च्या प्रशासकीय मान्यतेनंतर तब्बल 11 वर्षे प्रकल्प रेंगाळल्याने त्याची किंमत 113 कोटींवर पोहोचली आहे. हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरू नये याची काळजी जलसंपदा विभागाला घ्यावी लागणार आहे. करारानुसार हा प्रकल्प मार्च 2021 पर्यंत पूर्ण करायचा आहे. मात्र, पुढील टप्प्यातील कामे किती गतीने उरकणार यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
कास गावाभोवती होणार रिंग रोड
कास धरणाची उंची वाढविल्याने बामणोलीकडे जाणारा रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे कास गावाला वळसा घालून जाणाऱ्या रिंग रोडचा 21.84 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामाचा नारळ लवकरच फोडला जाणार आहे. मात्र, सरकारी पातळीवरील पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती यांची सांगड घातली जाणार का, हा प्रश्न आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, ऍड. दत्ता बनकर, जलसंपदा विभागाचे मोमीन यांनी दोन दिवसांपूर्वी प्रलंबित कामांची पाहणी केली.