पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली
औरंगाबाद- महाराष्ट्रात एकीकडे मुंबई जलमय झाली आहे. कोकणात धरणं फुटत आहेत. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातली आजही सगळी धरण कोरडीठाक आहेत. मराठवाड्यातल्या एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहीलेला नाही. मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जात आहे.
पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. एरव्ही जून महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीत असते. यंदा मात्र जुलै उजाडून देखील पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतेत आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडला. मात्र अद्यापही औरंगाबादसह इतर काही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच आहे.
मराठवाड्यात अजूनही धरणात पाणीसाठा शून्य टक्के पेक्षा खाली गेला आहे. जिल्ह्याची तहान मृत झालेल्या साठ्यातून केली जात आहे. मराठवाड्यातल्या 11 मोठ्या धरणात सध्या उणे दहा पॉईंट 34 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे एकीकडे मुंबई जरी पाऊस धो-धो पडत असला तरी मराठवाड्याला मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.
मराठवाड्यातील धरणांचा सध्याचा पाणीसाठा
धरण पाणीसाठा ( उणेमध्ये )
जायकवाडी, औरंगाबाद 9.16 टक्के
येलदरी, परभणी 19.19 टक्के
सिद्धेश्वर, हिंगोली 68.71 टक्के
माजलगाव, बीड 24.43 टक्के
मांजरा, बीड 21.50 टक्के
ऊर्ध्व पैनगंगा 2.00 टक्के
निम्न तेरणा, उस्मानाबाद 15.47 टक्के
निम्न मण्यार, नांदेड 8.15 टक्के
विष्णूपुरी, नांदेड 0.00 टक्के
निम्न दुधना, परभणी 19.19टक्के
सिना कोळेगाव, उस्मानाबाद 85.31 टक्के