– दिलीप पुराणिक
कराचीमध्ये मराठी माणसांची यादी खूप मोठी आहे. अनेक संकटे येऊनही त्यांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची आणि त्यांच्या इतर शंकाचे निरसन करण्याचा आम्ही “स्वप्न स्टडीज ऑनलाईन एजुकेशन’च्या माध्यमातून नेहमीच करत आहोत.
मराठी माणूस कराचीत कसा पोहचला? हा माझ्यासह अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. काही लोकांचे असे मत आहे की, त्यांचे पूर्वज युद्धप्रसंगी तेथे गेले असावेत; तर काही लोकांच्या मते पानिपतच्या युद्धात मराठे येथे गेले असावे. असाही एक मत प्रवाह आहे की, मुंबई विशेषतः कोकण, गोवा येथील लोक कराचीला व्यापारउदीम या निमित्त पोहचले असावेत. तेव्हा जहाज मार्गाने मोठ्या प्राणावर व्यापार होत असे.
फाळणीपूर्वी कराचीमध्ये हजारो मराठी कुटुंबे रहात होती. त्याही काळात मध्यमवर्गीय असले तरी सर्वच क्षेत्रात मराठी माणूस अग्रेसर होता. या काळात कराची मध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी मराठी माध्यमाच्या शाळा उपलब्ध होत्या.
दरम्यान एक मराठी वृततपत्र निघत असे त्याचे नाव सिंधमाराठा असे होते. पाकिस्तान मधले सक्करचे धरण गंगाधर निळकंठ गोखले या मराठी माणसाने बांधले. या धरणाच्या बांधकामावर मोठ्या संख्येने मराठी कामगार आणि अधिकारी होते. सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे आजोबा देखिल अनेक वर्ष कराचीत मोठ्या हुद्द्यावर कार्य करीत होते. कराचीला पंडित जनार्दन पेठे हे संगीताचे मोठे उपासक होते. त्यांच्याकडे लक्ष्मणराव बोडस आणि पंडित दत्तात्रय पलुस्कर हे नेहमी जात असत. फाळणीनंतर दादरला स्थाईक झालेले शरद बापट आणि प्रभाकर बापट बंधू कराचीत संगीत शिकवत असत. त्यावेळी ते लाहोरच्या अनारकली बाजारमध्ये ते रहात होते.
कराचीला नारायण जगन्नाथ वैद्य हे मराठी नाव असलेले विद्यालय आजही तसेच दिमाखात जिना रोड वर उभे आहे. या विद्यालयाची परंपरा खूप मोठी आहे. ही शाळा शासकीय होती. या शाळेत फारशी, मराठी, गुजराथी या भाषांमधून शिक्षण दिल्या जात होते. ला या शाळेमध्ये एकंदर विद्यार्थी होते हिंदू, हिंदू ब्राह्मण, जैन, मुस्लिम, आणि फारशी विद्यार्थी होते. साली याच नारायण जगन्नाथ विद्यालयाचे प्राचार्य अनसेकर सर होते. फाळणी नंतर ते तेथेच थांबले. शेवटच्या बॅचची बोर्डाची परीक्षा पूर्ण होऊ दिली आणि उरलेल्या मुलांना घेऊन ते भारतात परत आले. या काळात हे किती धरिष्ट्यचे होते याची कल्पना आजच्या तरुण पिढीला येणार नाही.
निळकंठ दामोदर अभ्यंकर हे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल मध्ये शिक्षक होते. ते कराची महाराष्ट्र मंडळाचे अनेक वर्ष सचिव होते. कराचीतील मराठी बांधवांचे चांगले संघटन त्यांनी उभे केले. कालांतराने महाराष्ट्र मंडळ बंद होऊन महाराष्ट्र पंचायत ही संस्था सुरू झाली. नारायण जगन्नाथ वैद्य हे अनेक वर्ष म्हैसूर राज्यात डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्टर होते. वैद्य यांना इंग्रज सरकारने रावसाहेब रावबहादूर ही पदवी देऊन सन्मानित केले होते. सिंध प्रांतातील त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीची आठवण म्हणून त्यांच्या नावाने मराठी शाळा कराचीत सुरू केली गेली.
कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना 1929 साली कराचीत करण्यात आली. विठ्ठल गणेश ऊर्फ बाबासाहेब प्रधान, श्री डी. व्ही अनवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन कराचीतील मराठी मुलांसाठी शिवाजी हायस्कूल ची स्थापना केली. फाळणी नंतर ही संस्था महाराष्ट्रात परत आली. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे कराची हायस्कूल सुरू करण्यात आले. या हायस्कूल ची दुसरी शाखा कुर्ला, मुंबई येथे सुरू करण्यात आली. कुर्ला येथील शाळेचे नाव आता शेठ इश्वरलाल हायस्कूल असे आहे. कोकणातील श्री पा ना मिसळ यांनी संपादित केलेले बाळसंगम नावाचे मासिक कराचीतील मराठी मुलांमध्ये लोकप्रिय होते.
फाळणी नंतर कराचीत गेलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मराठीतून प्राथमिक शिक्षणाची सोय सिंध सरकारने उपलब्ध करून दिली होती. कालांतराने ती शाळा बंद करण्यात आली.
कराचीमधल्या मराठी तरुणांमध्ये फुटबॉल हा खेळ अतिशय लोकप्रिय होता मराठी तरुणांचा संघ बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये खूप प्रसिद्ध होता. विनोद गायकवाड यांचे वडील शंकर गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांचे वडील लक्ष्मण गायकवाड संभाजी भोसले, आणि शंकर गायकवाड हे कराचीतील सुप्रसिद्ध खेळाडू होते. हे सर्व लोक फुटबॉल टीमचे नेतृत्व करीत असत. कराची मध्ये कापसे नावाचे अती श्रीमंत कुटुंब होते. त्यांनी त्यांची जमीन कराचीत गणपती मठ स्थापन करण्यासाठी दान दिली. त्यानंतर ते पुणे येथे स्थाईक झाले.
फाळणी आधी कराचीत अनेक मान्यवर इंग्रज अधिकारी नेते यांचे भग्न पुतळे होते. फाळणी नंतर सर्वच बदलले. कराची मधील म्युनिसिपल कॉर्पोरेशंच्या मैदानात हे भग्न पुतळे आजही ठेवले आहेत. हे सांगण्याचे कारण असे जगन्नाथ नारायण वैद्य हायस्कूल च्या प्रांगणात लोकमान्य टिळकांचा पुतळा होता या विद्यालयात सिंध प्रांताची अधिवेशने झाली. नंतर मात्र तेथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारण्यात आला. चिमाजी अप्पांची समाधीही कराचीत अशीच शोधावी लागणार आहे. अनेक वर्ष या समाधीच्या व्यवस्थेसाठी कोल्हापूर संस्थान कडून दरमहा रू पाठविले जात अशी माहिती मला मिळाली आहे.
कराचीतील सदर बाजार आजही गजबजलेला आहे. कराचीतील श्रीमंत हिंदू समाज या भागात रहातो. आपले मराठी बांधव सदर बाजार, पंजाब कॉलनी, रामस्वामी, जुब्ली, स्वामीनारायण मंदिर, गुजरी या परिसरात रहातो. आपले मराठी बांधव फाळणी पूर्वी मोठ्या संख्येने बोहरी कम्पाऊंड आणि फारशी कॉलनी मध्ये रहात होते. यात कोकणातून स्थलांतरीत झालेल्या मुस्लिम बांधवांचा पण समावेश होता. महाराष्ट्र पंचायत चे प्रमुख कार्यकर्ते श्री विशाल राजपूत हे कराची कॅन्ट रेल्वेस्टेशन जवळ रहातात. कराची शहर फारसे बदलले नाही.
अनेक जुने सिनेमा थिएटर बंद झाले. काही रोडची नावे बदलली, काही जुने हॉटेल बंद झाले आणि काही नवीन सुरू झाले. पण काही ऐतिहासिक वास्तू मात्र तशाच अजूनही तेथे आहेत. जसे गोवा असोसिएशंचे चर्च, हिंदू धर्म शाळा बंदर रोड, आणि एम्प्रेस मार्केट आजही गजबजलेले आहे. हिंदू आणि फारशी विद्यार्थ्यांचे आवडते दिल्ली कॉलेज करिमाबाद येथे आजही आपले शैक्षणिक कार्य अविरत करत आहे. जुन्या बंदर रोडचे नाव बदलून जिना रोड झाले आहे.
एल्फिन्स्टन रोडचे नाव बदलून झैब्बुनिसा रोड करण्यात आले. मेट्रोपोल हॉटेल, पर्ल कॅंटोन्मेंट हॉटेल, आणि लिरिक्स अँड बाबिनो सिनेमा यांच्या जागी आता भव्य मार्केट उभे आहे. स्वातंत्र्यानंतर सली बोहरी कंपाऊंड ला पहिला गणेश उत्सव साजरा करण्यात आला. येथील गणेश उत्सवाला पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान राणा लियाकत अली खान यांच्या पत्नीने भेट दिली होती.
फाळणीनंतर मोठ्या संख्येने पाकिस्तान मधील मराठी माणूसे महाराष्ट्रात दाखल झाली. त्यांच्या सोबत सिंधी बांधव देखील मोठ्या प्रमाणात होते. शासनाने त्यांची व्यवस्था जुन्या लष्करी कॅम्पमध्ये केली. काही कल्याण कॅम्प मध्ये राहत होते. काहींची व्यवस्था खडकी येथील छावणीत करण्यात आली. सिंधी समाज अत्यंत कष्टाने सर्व संकटांवर मात करून आर्थिक दृष्ट्या मोठे यश संपादन करू शकला. मराठी माणूस कराचीत होता तेव्हाही मधमवर्गियच होता. आज कराचीतील मराठी माणूस मध्यावर्गियच आहे. कराचीतील मराठी माणसांमध्ये वकील किंवा डॉक्टर नाही. नवीन पिढी मात्र अभियांत्रिकी सह इतरही क्षेत्रात यश संपादन करते आहे.
सिंधी बांधवांसोबत महाराष्ट्रात परतलेल्या मराठी बांधवांना देखील फारशी आर्थिक प्रगती करता आली नाही. त्या काळात छावणीतल्या मुलांना शिकवण्यासाठी मराठी सिंधी बांधवांकडून मराठी शाळा सुरू करण्यात आली. उल्हास विद्यालयाच्या स्वरूपात भव्य शाळा आपल्या समोर आहे.
मराठी संस्कृती जतन करणारी, मराठी भाषा शिकण्याची उत्सुकता असणारी मंडळी मोठ्या संख्येने स्वप्न स्टडीज ऑनलाईन एजुकेशनला जोडली गेली आहे. भारत-पाकिस्तान मराठी सेवा संघ ही त्यांची मोठी उपलब्धी आहे. मराठी परंपरा, मराठी राष्ट्रपुरुष महाराष्ट्रातील संत-परंपरा, सण-उत्सव, संस्कृती, देवस्थाने या सर्व बाबींची त्यांना ओळख करून द्यायची आहे. महाराष्ट्रातील सामाजिक क्रांती शाहू फुले, आणि आंबेडकर यांचे विचार त्यांच्या पर्यंत पोहचले नाही त्या मुळे जुन्या रुधीपरंपरा अजूनही त्या ठिकाणी आहेत, अंधश्रद्धा आहेत. त्या मोडीत, काढण्यासाठी आपल्याला प्रयत्नंकरायचे आहेत.