नवी दिल्ली – दिल्ली विधानभा निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना आपआपल्या मंत्रालयाने लोककल्याणाचे काय निर्णय घेतले याची माहिती जनतेला देण्याची सुचना एका पत्राद्वारे केली आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्रे, व अन्य माध्यमांमधून येत्या 15 फेब्रुवारी ते 31 मार्च या अवधीत सर्व मंत्र्यांनी ही माहिती जनतेपर्यंत पोचवावी अशी सुचना त्यांनी या पत्रांत केली आहे.
हा दीड महिन्यांच्या प्रचार मोहीमेला त्यांनी हर काम देश के नाम असे नाव दिले आहे. सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तशा सुचना जारी कराव्यात असेही त्यांनी मंत्र्यांना सुचवले आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने विकास कामांवर भर देऊन प्रचार केला. त्याचा त्यांना चांगला लाभ झाला. त्या उलट भारतीय जनता पक्षाने भावनिक मुद्द्यांचे राजकारण केले त्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे.
केजरीवालांना भाजप नेत्यांनी दहशतवादी असे संबोधले होते. खुद्द जावडेकर यांनीही केजरीवालांना दहशतवादी असे संबोधून ते दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावाच भाजपच्या अंगलट आला असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकरांच्या सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्याच्या या मोहीमेला महत्व दिले जात आहे.